उमाकाकू आपली दुपार शिफ्टची ड्युटी संपवून घरी चालल्या होत्या . आज अचानक त्यांची नेहमीची लोकल चुकली होती म्हणून त्यांनी सीएसटीवरून रात्रीची ११.३० ची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली होती. कल्याणजवळ आले कि एक्सप्रेस स्लो होते हा त्यांचा नेहमीच अनुभव गाठीशी होता तेव्हा आपण कल्याण स्टेशन जवळ आले की उतरू असा विचार करून त्या आत चढल्या. गाडीत गर्दी होती त्यामुळे त्या दरवाज्यात उभ्या राहून विचारत गढून गेल्या. शिवाय थोडे मागे उतरावे लागत असल्याने त्यांना अंधारात थोडे अंतर चालावे लागनार होते. रस्ता ओळखीचा आणि पायाखालचा असला तरी मनात थोडी भीती आणि धाकधूक होतीच. विचारात गढून गेल्या असतानाच त्यांना आतील प्रवाशांच्या गडबडीने कल्याण जवळ आल्याची चाहूल लागली आणि त्यांनी गाडी स्लो झाली की गाडीतुन खाली उडी मारली उतरल्यावर त्यांना आपण नेहमीपेक्षा थोडे मागेच उतरल्याने लक्षात आले . आणि त्या पदर सावरत लगबगीने चालू लागल्या. चालता चालता त्यांचे लक्ष रेल्वेरुळाच्या बाजूला पडलेल्या एक 25 ते 30 वर्षाच्या मुलीकडे गेले. ती विव्हळत होती आणि मधून मधून भूक भूक असे म्हणत होती. तिची अवस्था अत्यंत वाईट होती आणि हाडांचा सापळा झाला होता त्यामुळे हिला बरेच दिवस अन्न मिळाले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिचे बरेच शारीरिक आणि लैंगिक शोषण झाले असावे असे वाटून उमकाकूंना तिची दया आली. बाईनेच बाईची कदर केली पाहिजे असा विचार करून काकूंनी तिला हात दिला आणि उठून बसविले. आपल्या पर्समधील पाण्याची बाटली तिला दिली. पाणी प्याल्यावर तिला जरा हायसे वाटले. काकूंनी नुकतीच घेतलेली आपल्या आवडीची दही कचोरी तिला दिली. खाऊन जरा तरतरी आल्यावर काकूने तिला विचारले, "काय गं, किती दिवस झाले तू उपाशी आहेस?" तिने काकूंच्या पदर हातात घेऊन आपले तोंड पुसले आणि खो खो हसत म्हणाली, झाले असतील चांगले तीस पस्तीस वर्षे!" आता ती आणि काकू रोज कोणीतरी आपल्याला जेवण देणारे भेटेल का? याची वाट पाहत असतात.
©के. राहुल ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment