रवी आणि प्रिया आज पाच वर्षानंतर बाहेर फिरायला गेले होते. तसे ते लग्नाच्या अगोदर खूप फिरले होते पण लग्न झाल्यावर मात्र घर संसार आणि आयटी क्षेत्रातील जॉब यामुळे त्यांना कोठेच जात आले नव्हते. त्यातच त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह. समाजापुढे काहीतरी आदर्श घालून द्यायचा म्हणून दोघांनी आपापल्या नातेवाईकांचा विरोध फाट्यावर मारून बंड केले आले आणि प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन दोघांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. अगदी सर्व काही सेट झाल्याशिवाय मुलही होऊ दिले नाही. तसे त्यांनी एकमताने ठरविले आणि त्यावर ते कायम राहिले. याला आता पाच वर्षे पूर्ण झाली होती. आता त्यांना आपल्याला बाळ असावे असे वाटू लागले होते. त्याच्या आगमनानंतर आपण परत पाच वर्षे तरी अडकून पडू याची जाणीव होऊन त्यांनी यंदा चार दिवस फिरायला जायचा बेत आखला. पण कोठे जायचे यावरून पुन्हा नेहमीप्रमाणे मतभेद झाले. दोघांनाही बीचवर फिरायला जायचे आवडायचे पण बीच मात्र वेगवेगळा. प्रियाला लाडघर तर रवीला वेळणेश्वर. यावरून त्यांचं कित्येकवेळा याअगोदरही भांडण झाले होते तसेच यावेळीही झाले. पण प्रिया मात्र हाटून बसली होती की गेलो तर लाडघरलाच जायचे म्हणून. तसा रवी नेहमी पडती बाजू घेत असायचा त्यामुळे एकदातरी तिने आपले ऐकावे असे त्याला वाटायचे. पण प्रियाला मात्र याची जाणीव नव्हती. याचा रवीला यावेळेस खूपच राग आला होता. पण तो सहसा प्रियाचे मन मोडत नसे म्हणून यावेळेसही नाईलाजाने लाडघरला जायला तयार झाला आणि दोघे लाडघरला पोहचले. प्रियाने अगोदरच लॉज बुक करून ठेवला होता. रवीने तीन तासाच्या प्रवासात एक शब्दही उच्चारला नव्हता. त्याने बॅग रूमवर टेकवली आणि हातात सिगारेटचे पाकीट आणि लायटर घेऊन तो थेट बीचवर जाऊन आडवा झाला. प्रियाने रवीची वाट पाहून बेडवर अंग टाकले. रात्रीचे बारा वाजून गेले तरी रवी आला नाही म्हणून ती बीचवर गेली तर रवी आकाशातील चंद्र बघत आडवा झाला होता. प्रिया त्याच्या हाताची उशी करून शेजारी आडवी झाली . त्यांच्या तोंडातला सिगारेट तिने फेकून दिली. रवी उठून जाऊ लागला. तिने त्याचा हात धरून त्याला थांबविले आणि त्याच्या गळीत पडून रडु लागली. रवीने तिचे डोळे पुसले आणि तिला शांत केले. गोघानी राग निवळे पर्यंत अस्प्ल्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील गप्पा मारल्या. शेवटी रविचा राग निवळला. तो तिला म्हणाला, " चल रूमवर जाऊ. बरीच रात्र झाली आहे". "तू पुढे हो मी पाचच मिनीटात आले", असे प्रियाने म्हटल्यावर रवी रूमवर आला तर प्रिया बेडवर गाढ झोपेत होती. रवी धावतच परत बीचवर गेला पण तिथे कोणीच नव्हते.
© के. राहुल ९०९६२४२४५२
Comments
Post a Comment