Skip to main content

चाकोरी बाहेरचे शुभमंगल.......!

चाकोरी बाहेरचे  शुभमंगल......!


        बरीच वर्षे झाली हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेमाचे वेगळे अंग आणि आयाम दाखविणारा चित्रपट आला नव्हता. त्यामुळे प्रेक्षक म्हणून अनेकजण चोप्रा छापाचे गल्लाभरू चित्रपट पाहून वैतागले होते. काहीतरी वेगळं आणि सकस पाहण्याची भूक सुजाण प्रेक्षकांना असतेच असते.  गेल्या पाच वर्षात असे अनेक यशस्वी प्रयोग हिंदी चित्रपट सृष्टीने केले. पण चोखंदळ प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी नवीन हवे असते. तसे वेगळेपण देण्याचा प्रयत्न अनेक नव्या निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांनी केला आहे. त्यातील सध्याचे आघाडीचे नाव म्हणून आयुष्यमान खुराणाकडे पाहता येते. हे वेगळेपण कसे काय जमते? याचे साधेसोपे उत्तर म्हणजे त्याने कधीच परिपूर्ण नायक साकारलेला नाही (शिवाय जगात कधीच आणि कोणीच परिपूर्ण नसतो). समाजाच्या दृष्टीने वर्ज्य आणि दुर्लक्षित केले जाणारे अनेक विषय आव्हान म्हणून आयुषमानने आनंदाने स्वीकारले आणि आपल्या अभिनय क्षमतेच्या जोरावर यशस्वीपणे पेलले सुद्धा! म्हणूनच हे वेगळेपण दाखविणाऱ्या त्याच्या भूमिका आणि  चित्रपट सामान्य प्रेक्षकाला भावतात. अशीच भूमिका "शुभमंगल ज्यादा सावधान" मध्ये आयुष्यमान आणि जितेंद्रकुमार यांनी साकारलेली आहे. 
        पालक म्हणून जीवन जगताना प्रत्येक स्त्री आणि पुरूषाला आपण स्वतः कसेही असलो तरी आपल्या मुलांनी मात्र आम्ही म्हणू तसेच ऐकावे आणि आम्ही सांगू तेच करावे असे वाटत असते. मुलांना काय आवडते? काय आवडत नाही? हे आई वडिलांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाच इतके ठामपणे माहीत नसते. पण त्यांच्या आवडीनिवडीमुळे आपले स्वप्न साकार होणार नसेल तर पालक त्यांच्यावर आपल्या अपेक्षांचे ओझे लादताना दिसतात. मूल जोपर्यत कळत्या वयाचे होत नाही तोपर्यत ते पालकांच्या अपेक्षांना असेच बळी पडत जाते किंवा त्याच्यात पालकांना विरोध करण्याचे नैतिक बळ किंवा सामर्थ्य नसते म्हणून ते त्यांच्या दबावाला बळी पडते.  पण तरीही ते आपल्या कृतीतून मला तुमचे हे वागणे आवडलेले नाही हे सतत दाखवून देत असते. त्यातूनच ते निरीक्षण शक्तीने आपल्या पालकांचे कच्चे दुवेही शोधत असते. पालकांच्या उक्ती आणि कृतीमध्ये फरक असेल तर मुले त्यांच्याबाबत अपपारभाव ठेवून वागायला लागतात. तरीही पालक त्याबाबत आपली भूमिका बदलत नसतील तर मुले स्वतःला हवी असणारी स्पेस स्वतः शोधायला लागतात. त्यात आपल्या आवडीचे काय आहे? काय करायला आवडते? कोणाबरोबर रहायला-बोलायला आवडते याबाबतचे निर्णय स्वतः घ्यायला लागतात आणि पालकांच्या भाषेत ते मूल बिघडायला लागलंय असे म्हटले जाते. 
मुले- मुली दहावीच्या म्हणजे १५-१६ व्या वर्षाच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यात हे बदल वेगाने होत जातात. याच काळात त्याच्या कामभावना आणि त्याबाबतचे कलसुद्धा निश्चित होतात. नैसर्गिकरित्या हे कल जसे भिन्नलिंगी असतात तसेच ते समलिंगीही असू शकतात. मुळात हा कल लहानपणी सुद्धा मुलाच्या आवडीनिवडी, राहणीमान, बोलणे आणि वागण्यातून लक्षात यायला लागतो. सगळ्यात अगोदर हे बदल लक्षात येतात ते पालक आणि मूल ज्यांच्या सान्निध्यात जास्त काळ असते त्या आप्तस्वकीयांच्या. त्याचे वागणे, बोलणे, आवाज, हावभाव, आवडी निवडी याबाबत प्रश्न उपस्थित व्हायला लागतात. त्यातून  पालकांना आणि बहीण-भावंडे यांना अपमानाचे प्रसंग झेलावे लागतात. त्यातून नकळत त्यांच्याकडून या मुलांवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार व्हायला लागतात. त्यांची कुचंबणा व्हायला लागते. पालक फारच आक्रस्ताळे आणि कर्मठ विचारांचे असतील तर अश्या मुलांना कायमचा बाहेरचा रस्ताही दाखविला जातो.
       असेच जीवन शुभमंगल...... मध्ये आयुषमानच्या वाट्याला येते. व्यवसायाने लोहार असलेले आणि अशिक्षित असलेले त्याचे वडील आपला मुलगा समलिंगी असल्याचे समजताच त्याला थेट मारून घरातून हाकलून देतात. पण तो हुशार आणि कर्तृत्ववान आहे. दिसायला देखणा आणि उमदा आहे. स्वतःचे अर्थार्जन स्वतः करण्याची धमक त्याच्या अंगी आहे. शिवाय अमनसारखा जोडीदारही आता त्याच्याकडे आहे. त्यामूळे समाजापासून लपून त्याचे आणि अमनचे प्रेमप्रकरण सुरू आहे. पण त्यात कोठेही अश्लीलता नाही. समाजात एकटे गेल्यावर निर्माण होणारी वेगळेपणाची भावना समाजात दोघे वावरत असताना एकदम नाहीशी होते आणि दोघांनाही एकमेकांमूळे सुरक्षित वाटते हे या नात्याचे आणखी एक बलस्थान.  याच आनंदात ते रेल्वे प्रवासात असताना चुकून झोपी जातात आणि थेट अलाहाबादला पोहचतात. हे अलाहाबाद म्हणजे अमनचे गाव. घर आणि नातेसंबंध यांना पारखा झालेला आयुष्यमान अमनच्या घरी जाण्याचा हट्ट करतो. त्याच्या चुलत बहिणीचे (गॉगल हे भन्नाट नाव असलेली) लग्न असते आणि त्यासाठी अमन जायला तयार नसतो कारण त्याचे आई वडील बहिणीच्या लग्नात त्याचेही लग्न जमावणार असतात. आपला लैंगिक कल घरचे समजून घेणार नाहीत म्हणून तो घरी जाणे टाळत असतो. पण "माझे वडील अडाणी आणि लोहार आहेत, त्यांना हे कधीच कळणार नाही; पण तुझे कुटूंब उच्चभ्रू आणि सुशिक्षित आहे आणि वडील तर शास्त्रज्ञ आहेत. विज्ञान समलिंगी आणि भिन्नलिंगी यात भेद करत नाही किंवा त्याला चुकीचे समजत नाही. त्यामुळे ते आपल्याला नक्की समजून घेतील",अशी आशा आयुष्यामानला वाटते.  पण आपल्या पालक आणि नातेवाईकांना पुरता ओळखून असलेल्या अमनला मात्र आपल्याला कोणीच समजून घेणार नाही याची खात्री असते. रेल्वे प्रवासात याच विषयांवर वाद चालू असताना एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या जोडप्याला वेगळ्या अवस्थेत अमनचे वडील प्रत्यक्ष पाहतात आणि काय करून यांना वेगळे करता येईल यासाठी त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे डावपेच सुरू होतात.
तुझा लैंगिक कल अनैसर्गिक आहे आणि ते मानसिक आजाराचे लक्षण आहे. उपचारानंतर सगळे ठीक होईल आणि पुन्हा तू पूर्ण पुरुष होशील पण त्यासाठी तुझी आणि आयुषमानची ताटातूट होणे आवश्यक आहे असे सांगून त्यांना वेगळे करण्याचे कसोशीचे प्रयत्न केले जातात. आपल्या मुलाचे जिवंतपणी श्राद्ध  घालून त्यांचे बारसे केले जाते. आता त्याचा नवीन जन्म झाला असून सगळे ठीक होईल असा आशावाद कुटुंबातील सगळेच व्यक्त करतात. पण आयुष्यमान त्याला सोडून जायला तयार नाही हे पाहून त्याला अमानुष मारहाण केली जाते. एवढेच काय तर अमनचे त्याच्या इच्छेविरुद्ध लग्नही ठरविले जाते. अमनचा मानसिक कोंडमारा व्हायला लागतो. आईवडिल आत्महत्येची धमकी द्यायला लागतात. वडील फास घ्यायचा प्रयत्न करतात. आयुष्यमानची अवस्था आणखी बिकट होते जोडीदारासोबतच नातेवाईक आणि कुटुंबाच्या प्रेमाला आसुसलेला आयुष्यमान बिथरतो, चीड चीड करायला लागतो. जोडीदाराचे  कुटुंब मिळविण्याच्या नादात आपण जोडीदारही गमावून बसतो की काय? या विचाराने तो आतून तुटायला लागतो. नेहमी "जॅक आणि जिल" हे भिन्न लिंगीच का हिलवर जातात? समलिंगी हिलवर गेले तर काय बिघडेल? हा प्रश्न तो आजूबाजूला असलेल्या लोकांना विचारत सुटतो. मुलांना शिक्षण देताना हा लिंगभेद आपण जाणूनबुजून करतो. समलिंगीना त्यांचं वेगळं जग नको आहे. त्यांना सर्वांबरोबर आनंदाने रहायचे आहे अश्या भावना व्यक्त करत तो रेल्वेस्टेशनवर सैरभैर फिरताना व्यक्त करतो. त्याचे बोलणे ऐकून त्याला झिडकरणाऱ्या लोकांची प्रेक्षक म्हणून आपल्यालाही चीड यायला लागते ही आयुष्यमानच्या अभिनयाची ताकद चित्रपटात वारंवार अनुभवायला येते.
      आयुष्यमानसारखा ताकदीचा अभिनेता समोर असतानाही जितेंद्रकुमार या नवख्या अभिनेत्याने त्याला तोडीस तोड भूमिका केली आहे मित्रावरचे प्रेम, पालकांचा विरोध, त्यातून झालेली घुसमट आणि अगतिकता साकारताना त्याने आयुष्यमानवर मात केली आहे. वडील आपल्या जिवलग मित्राच्या जीवावर उठले आहेत हे पाहून त्याला वाचविण्यासाठी आणि आईवडिलांच्या समाधानासाठी त्यांच्या पसंतीच्या मुलीबरोबर लग्न करायला होकार देताना त्याने केलेला अभिनय अप्रतिम आहे. गॉगलच्या लग्नात दोघांनी केलेल्या प्रणयनृत्यामुळे गॉगलचे लग्न मोडते आणि ती आत्महत्या करायला रेल्वेस्टेशनवर जाते तेव्हा  त्याला सोडून जाणारा आयुष्यमान तिला वाचवतो आणि तिच्या घरी  घेऊन जातो तेव्हा एका डोळ्यांनी अंध असलेली आणि म्हणून लग्न जमत नसलेली गॉगल तिने लग्न करावे म्हणून तिला टोमणे मारत असतात त्यामुळे ती रागाने तिच्या वयाची मुले असलेल्या म्हाताऱ्याबरोबर लग्न करायला तयार होते. तेव्हा तोच म्हातारा तुझा भाऊ समलिंगी आहे म्हणून तिच्याशी लग्न करायला नकार देतो. तेव्हा गॉगलने तिच्या भावाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे आणि मला हे लहानपणापासूनच माहीत आहे असे म्हणणे अमनला उभारी देणारे ठरते. शिवाय अमनला सोडून जाणाऱ्या आयुष्यमानला रेल्वे स्टेशनवर जाऊन अडविणे आणि तुमच्या दोघांची जोडी मला आवडते. एकत्र राहिलात तर तुम्ही सुखी व्हाल असे सांगते तेव्हा एक डोळ्याने आंधळी गॉगल सगळ्यांपेक्षा डोळस वाटायला लागते.
     बाकी अमनचे आई वडील म्हणून नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्या भूमिकाही अत्यंत तगड्या झाल्या आहेत. दोघांची  आपल्या कॉलेज  जीवनातिला प्रेमप्रकरणे, त्यात या वयातही गुंतलेले असणे आणि तरीही संस्कृती म्हणून संसाराचा गाडा रेटणे त्यांनी सहज साकारले आहे. एकत्र कुटुंब पद्धतीतील भाऊ-भाऊ आणि जावा-जावा यांचे आपापसातील हेवेदावे आणि तरीही संकटकाळी सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे ही चित्रपटाची जमेची बाजू. आणि ती अत्यंत विनोदी अंगाने मांडली आहे हे दिग्दर्शकाचे कौशल्य.
       बाकी टाळता येण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. पण म्हणून चित्रपट बघण्याचे टाळणे योग्य नाही. पण विषय समलिंगी असल्याने ग्रामीण आणि निमशहरी भागात चित्रपट गृहे ओस पडली आहेत. एवढे मात्र टळायला हवे होते.
©के. राहूल, ९०९६२४२४५२.

        

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...