Skip to main content

सुजयचे बोल आणि सत्याच्या पलीकडेचे!

सुजयचे बोल आणि सत्याच्या पलीकडे!


         सुजय डहाके या होतकरू आणि उगवत्या दिग्दर्शकाने मराठी मालिकेतील प्रमुख पात्रे विशेषतः महिला ब्राह्मण असतात आणि मराठी चित्रपटसृष्टी जातीयवादी आहे असे मत मांडले. त्यानंतर लगेचच त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया यायला लागल्या. अनेक ब्राह्मण अभिनेते आणि अभिनेत्रींनी त्याविरुद्ध तिखट प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्याच्या श्रीमुखात भडकविण्याची भाषा केली. नंतर त्यात हिंदू महासभेने उडी घेतली आणि सुजयच्या विरोधात रान पेटवायचा प्रयत्न केला त्यानंतर लगेचच संभाजी ब्रिगेडनेही सुजयला पाठींबा दिला. समाजमाध्यमे वगळता प्रिंट मीडियाने आणि वृत्त वाहिन्यांनी याची फार दखल घेतली नाही. जरा काही खट्ट झाले की तासनतास चर्चेचे फड रंगविण्यात पटाईत असलेली ही माध्यमे या विषयावर मूग गिळून गप्प राहिली. त्यामुळे सुजयच्या म्हणण्यावर मुद्देसूद चर्चा घडणे अपेक्षित असताना तसे झाले नाही. हिंदू महासभा आणि संभाजी ब्रिगेडच्या भूमिका राजकीय असल्याने त्या काहीवेळ बाजूला ठेवून याकडे तटस्थपणे पहायला हवे.
       याबाबतचा माझाही अनुभव फार चांगला नाही. तो मांडून मग या विषयाकडे जाऊया. त्यामुळे या मुद्द्यावर व्यक्त होताना हे सत्य मांडले म्हणून माझ्यावरही टीका होण्याची किंवा मला जातीयवादी ठरविण्याची दाट शक्यता आहे पण त्यामुळे न बोलता गप्प बसणे मनाला पटत नाही म्हणून बोलणे आवश्यक आहे.
        मी स्वतः फार मोठा लेखक नाही पण सामान्य कथा आणि पटकथा लिहितो. मी काही कथा आणि पटकथा लिहिलेल्या आहेत. त्या लिहीत असताना आणि नोंदणीकृत करत असताना मी फक्त माझ्या आडनावातील पहिले 'के' हे अक्षर वापरतो. माझ्या कथेची 'वन लायनर' मी मराठीतील एका प्रतिथयश दिग्दर्शकाला पाठविल्यानंतर त्यांना ती पसंत पडली आणि त्यांनी मला त्यांच्या सहाय्यकाला भेटून कथा आणि पटकथा सुपूर्द करायला सांगितली त्याप्रमाणे त्यांच्या सहाय्यकाची वेळ घेऊन मी त्यांना भेटायला गेलो. मुंबईस्थित हे सहाय्यक एका राजकीय पक्षाच्या चित्रपट विभागाचे मोठे पदाधिकारी होते. दिग्दर्शकांचा संदर्भ देऊन त्यांना कथा दाखविल्यावर त्यांनी माझे नाव वाचले आणि माझ्या आडनावातील हा 'के' म्हणजे नक्की काय? असा प्रश्न केला. माफ करा पण  'मी माझे आडनाव लावत नाही आणि कुणाला सांगतही नाही'  असे म्हटल्यावर हे महोदय हट्टाला पेटले म्हणाले, तुमच्या आडनावातील हा 'के' कुलकर्णीचा आहे की कांबळेचा आहे की काळेचा आहे ते मला कळायलाच हवे त्याशिवाय मी कथा वाचणारच नाही. मी जेव्हा त्यांना स्पष्ट शब्दांत माझे आडनाव सांगायला नकार दिला तेव्हा त्यांनी ती कथा बाजूला ठेवली आणि आज तागायत ती तशीच बाजूला असावी किंवा रद्दीत तरी गेली असावी.
       यामागचा त्यांचा उद्देश माझ्या अजूनही लक्षात आलेला नाही. म्हणजे यामागे त्यांचा अहंकार होता की त्यांना त्यातून माझी जात शोधायची होती. मुळात या क्षेत्रातील लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारची दंभ आणि अहंकार असतो. बऱ्याच वेळा तो त्यांच्या जातीमूळे, जातीच्या मक्तेदारीतून आलेला असतो तर बऱ्याचवेळा तो अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर मिळालेल्या भरीव यशात असते. काही लोकांच्या बाबतीत जात आणि यश दोन्हीही असते. आपली या क्षेत्रातील मक्तेदारी मोडीत निघते की काय अशीही भीती यामागे असते.
      सुजयवर तोंडसुख घेणाऱ्या बऱ्याच जणांनी तो काय म्हणाला हे नीट पाहिले ऐकले ही नसेल. सुजयने जे मत मांडले आहे त्यात त्याने मराठी चित्रपट सृष्टीत इतर जातींचे प्रतिनिधित्व नाही असे कुठेही म्हटलेले नाही. तर ब्राह्मण वगळता इतर जातींच्या अभिनेत्री मुख्य भूमिकेत का नाहीत? हा त्याचा प्रश्न होता आणि तो मांडताना त्याने मराठी मालिकांची एक मोठी यादीच समोर ठेवली आहे. आणि ही यादी नीट पाहिली तर एकदा दुसरा अपवाद वगळता इतर जातींच्या अभिनेत्री आपल्याला शोधूनही सापडणार नाहीत. पुरुष पात्रांसह इतर लहान मुलांपासून आजी आजोबांपर्यतची बहुतांश पात्रे ही एकाच जातीचे प्रतिनिधीत्व करतात.
           मालिका आणि चित्रपटातील पात्रांना नावे देतानाही आपल्याला हा जातीवाद ठळकपणे जाणवतोच की, उदाहरणच घ्यायचे झाले तर मराठीतील सध्या हयात नसलेल्या एका प्रतिथयश महिला निर्माती आणि दिग्दर्शिकेच्या चित्रपटातील खलनायक हे पाटील आणि देशमुख राहिलेले आहेत आणि नोकर चाकर हे (त्यांच्या नाव-आडनावावरून वरून) मागासवर्गीय राहिलेले आहेत. बाबा आमटेंवरील चित्रपटातील भ्रष्टाचारी लेखनिक हा कांबळे आडनावाचाच असतो. सोज्वळ आणि उच्च पदस्थ पात्रे ही नेहमी सवर्णांचे आणि ब्राह्मणांचे प्रतिनिधित्व करतात.  ब्राह्मणेतर सगळे असेच असतात हा रोजच्या जगण्यातील दृष्टिकोन आपल्या विचारातून आपल्या लेखनात स्क्रीनवर उतरतो की काय? हे ही एकदा तपासून पहायला हवे.
       सुजयवर टीका करताना काहींनी नागराज मंजुळे आणि साने यांचे उदाहरण दिले पण कोणताही नियम हा अपवादाने सिद्ध होत नाही हे यांना कोण समजावून सांगणार? शिवाय नागराज आणि साने यांची जोडी अशीच सहज भेटले आणि एकत्र आले असे मुळीच झालेले नाही कारण त्यात गार्गी कुलकर्णी हा महत्वाचा दुवा आहे हे विसरून चालणार नाही. म्हणजेच प्रस्थापित वर्गातील कोणीतरी हात दिल्याशिवाय कितीही गुणवत्ता असलेला मागासवर्गीय माणूस पुढे येऊ शकत नाही. कारण त्याला पुढे आणण्यासाठी त्या प्रस्थापित वर्गातील दोन माणसांमधूनच अंतर्गत संघर्ष घडून येतो. सगळ्याच मागासवर्गीयांच्या बाबतीत असा दुवा मिळेल अशी शक्यता फारच कमी आहे. दुसरा मुद्दा सैराटच्या यशाचा आणि कलाकारांचा आहे. सैराटने इतके अभूतपूर्व आणि मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरणारे यश मिळविले पण एकही प्रस्थापित कलाकार(अपवाद जितेंद्र जोशी, हेमांगी कवी आणि स्पृहा जोशी यांचाच, हेही नवखेच आहेत), किंवा निर्माता, दिग्दर्शक  त्यांचे जाहीर कौतुक करताना दिसला नाही.  उलट त्यांचे हे यश सहन न झाल्याने त्यांच्या घटस्फोटीत पत्नीच्या आडून त्यांना बदनाम करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. सैराटने रिंकू राजगुरूसारखी होतकरू आणि गुणी अभिनेत्री मराठी चित्रपट सृष्टीला दिली त्याला तीन वर्षे होतील पण एकाही प्रस्थापित निर्मात्या-दिग्दर्शकाला तिला आपल्या चित्रपटात मुख्य भूमिका द्यावे असे वाटले नाही. पण नागराज मंजुळेनी रिंकू नंतर नाळ मध्ये देविका दप्तरदार बरोबर काम केले आहे. तर सैराट २ मध्ये सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
           सद्या सुरू असलेल्या विविध मालिकेतील सांस्कृतिक वातावरण हे ब्राह्मण्यवादी विचारसरणीला अनुसरून आहे आणि त्यांचा सर्व प्रेक्षक वर्ग हा बहुजन विशेषतः महिला वर्ग आहे. त्या महिलांना या मालिकांचे अप्रूप आहे कारण त्या मालिकांमधील महिला यांच्या वास्तवाशी साधर्म्य साधत नाहीत. या मालिकांमधील वातावरण पाहून स्वतःबद्दल कमीपणाची भावना निर्माण होते किंवा आपले आयुष्य फारच फालतू किंवा कष्टप्रद आहे असे वाटते, हे मी स्वतः डेलीसोप पाहणाऱ्या अनेक महिलांशी बोलून आणि निरीक्षणातून अनुभवले आहे. बदलत्या काळात अनेक निर्मात्यांनी ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या कथांवर मालिका निर्माण केल्या असल्या तरी त्यातील हुशार पात्रे मात्र याच वर्गाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात उदा. तुझ्यात जीव रंगला!
       याचबरोबर काही मराठी जातीच्या निर्मात्यांच्या मालिकाही आता आलेल्या आहेत आणि त्यातली नायक- नायिकांची आडनावे मराठा जातीचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. जसे की लगीर झाली जी आणि मिसेस मुख्यमंत्री. याचा अर्थ निर्माता दिग्दर्शक ज्या जातीचा असेल त्या जातीच्या नायक नायिकांची चलती असणार असाही अर्थ निघतो. म्हणजे इतर क्षेत्रांतील जातीयवादी व्यवस्था चित्रपट सृष्टीतही संक्रमित झाल्याचेच दिसून येते. आणि ही व्यवस्था आजच आलेली नाही.
           गेल्या ५० वर्षांचा चित्रपटसृष्टीचा इतिहास पहिला तर याची वारंवार प्रचिती येते. तमाशाप्रधान चित्रपटातील नाईकिनी किंवा खलप्रवृत्तीच्या भूमिका खालच्या वर्गातील अभिनेत्रींच्या वाट्याला येत असत. त्यांना क्वचितच घरंदाज नायिकेच्या भूमिका मिळालेल्या आहेत. शापित चित्रपटातील दमदार अभिनयानंतरही मधू कांबीकरांना मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना गुणवत्ता असूनही कमी वयातच चारीतरभूमीका स्वीकाराव्या लागल्या. याउलट सवर्ण अभिनेत्रीनी नाचकाम किंवा तत्सम खालच्या दर्जाच्या भूमिका करू नये असाही कटाक्ष होता.
क्रमशः
के.राहुल, ९०९६२४२४५२
         
     
        


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...