Skip to main content

झाकली मूठ........!

झाकली मूठ........!
©के.राहुल 9096242452
         माणसाने आपले सुख-दुःखांचे क्षण, चांगल्या-वाईट गोष्टी आणि कळत नकळत झालेल्या चुकांबाबत दुसऱ्या व्यक्तीशी बोलावे की नाही? आपल्या सुख-दुःखात दुसऱ्याला सहभागी करून घ्यावे की नाही? याबाबत बहुतांश माणसे शाशंक असतात. कारण आपण कितीही हुशार, सुजाण, समाज आणि माणसे वाचणारे असलो तरी याबाबतीत समोरचा माणूस तितका योग्य आहे किंवा नाही याबाबत आपल्याला खात्रीपूर्वक काहीच सांगता येत नाही. त्यातल्या त्यात सुख-दुःखात दुसऱ्याला सहभागी करून घेताना माणूस फार विचार करत नाही कारण त्यातून समोरच्या माणसाचा  फार अंदाज आला नाही तरी त्यातून होणारे दुष्परिणाम फारच अल्प असतात किंवा नसतातही.  पण आपल्या चुकांची कबुली देताना मात्र माणूस नेहमीच द्विधा मनस्थितीत असतो. कारण सुख-दुःख आणि चुकांचे मानसशास्त्र एकमेकांपासून खुपच वेगळे असते.
         आपल्या चुकांकडे समोरचा माणूस मग तो आपल्या कितीही जवळचा असला तरी कसा पाहतो आणि ती चूक कळल्यानंतर समोरचा माणूस मग तो कितीही जवळचा असला तरी कसा वागेल किंवा त्याचा काय अर्थ लावेल याचा तर्क लावणेही अवघड असते.  बऱ्याचदा त्या माणसाला आपण कायमचे गमावून बसू ही भीती असते.  आपली चूक किती गंभीर आहे यावरही ते अवलंबून असते. त्यामुळे चुका झाकून ठेवण्याकडे माणसाचा नेहमीच जास्त कल असतो, कारण आपल्या चुका सांगितल्या तर त्यातुन आपली प्रतिमाभंग होण्याची, वारंवार तश्या चूका केल्या असतील किंवा होत असतील तर आपले खरे रुप समोर येण्याची किंवा त्या माणसाशी असलेले आपले नाते कायमचे संपुष्टात येण्याची अनामिक भीती असते. बऱ्याचवेळा वेळा जसे आपल्या चुका लपवून ठेवण्यामागे धुर्तपणा असतो तसेच बहुसंख्याकांचे हितही असते आणि व्यक्तिपरत्वे ते भिन्न असते. पण असे असले तरी माणूस बऱ्याचवेळा आपल्या चुकांबाबत "झाकली मूठ......." असे मानून गप्प बसणे पसंत करतो.
        अश्या या झाकल्या मुठीवर प्रकाश टाकणारे अनेक चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्याला दिले. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ चालू असताना असे अनेक चित्रपट येऊन गेले आणि ते निर्माता-दिग्दर्शक यांच्यापेक्षा कथा आणि पटकथा लेखनासाठी समरणात राहिले. कारण ते यशस्वी झाले तेच मुळी सशक्त कथा आणि पटकथामुळे! १९८९ साली आलेला "कमला की मौत" हा असाच चित्रपट बासूदांच्या सशक्त पटकथा लेखनासाठी ओळखला जातो.
            कमला नावाची एक होतकरू, हुशार आणि अवखळ महाविद्यालयीन तरुणी महाविद्यालयातील एका तरुणाच्या प्रेमात पडते. तो तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्यातून कमलाला दिवस जातात आणि मग मात्र तो तरुण तिच्याशी लग्न करायला नकार देतो. तिला टाळायला लागतो.  कमला त्यामुळे निराश होते, कोमेजून जाते. चाळीत राहणारी कमला एक दिवस आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी होईल म्हणून एकदिवस सगळ्यांची नजर चुकवून चाळीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करते. इथपर्यंतची कथा आपण अनेक चित्रपटात पहिली आहे पण इथुनपुढे ही कथा एक वेगळ्या वळणावर जाऊन पोहचते.
      सगळी चाळ कमलाच्या अचानक जाण्याने हळहळते. सगळे लोक आपापल्या परीने तिच्या मुत्यूबाबत तर्कवितर्क लढवायला लागतात. याच चाळीत गेल्या २५ वर्षांपासून सुखाने राहणारे एक चौकोनी कुटुंब आहे. तेही या घटनेनंतर हादरून जाते. कारण या कुटुंबातील मोठी मुलगी कमलाची मैत्रीण आहे. दुसरी लहान मुलगीही महाविद्यालयात पहिल्या वर्षाला आहे. त्यामुळे कमलाची ही भानगड या दोन्ही मुलींना माहीत होती आणि तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईला आणि आईकडून वडिलांना समजते. कमलासारखी मुलगी असे कसे करू शकते या विचाराने हे कुटूंब जरा जास्तच अस्वस्थ होते. मुलाने फसविले म्हणून काय झाले, तिने गर्भपात करून नवीन आयुष्य सुरू करायला हवे होते, वेळ हे सगळया दुःखावर औषध आहे असे आई वडील विचार करायला लागतात तर कमलाने त्याला जाब विचारायला हवा, त्याला चांगली अद्दल घडवायला हवी अशी चर्चा दोन्ही मुली आपापसात करायला लागतात. या घटनेचे असे ही अति चर्चितचर्वण चालू असतानाच आपल्या मुलींच्या बाबतीत असे झाले तर काय? या विचाराने आई आणि वडील दोघांचीही झोप उडते. दोघांनाही आपला लग्नाच्या अगोदर इतिहास आठवायला लागतो.
     "कमलापेक्षा कोवळ्या वयात म्हणजे दहावीत असतानाच आपण प्रेमात पडलो आणि आपली फसवणूक झाली म्हणून आपणही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण नशीब बलवत्तर म्हणून आपण वाचलो. पण आपले प्रेमप्रकरण सगळ्या गावभर झाल्यावर मात्र आई वडिलांनी आपल्या कोवळ्या वयातच आपले लग्न लावून दिले. पण आपला नवरा म्हणजे अत्यंत देवगुणी माणूस निघाला. इतका शिकलेला, चांगल्या  पदावर नोकरीला असतानाही विशेष म्हणजे शहरीबाबू असतानाही कसलीही अधिक चौकशी न करता लग्नाला तर तयार झालाच पण इतक्या वर्षात त्याने कधीही आपल्यावर कसलाही अविश्वास दाखविला नाही की अपमानाचे प्रसंग येऊ दिले नाहीत. आपण चुकलो पण आपला नवरा मात्र सभ्य माणूस आहे. चुकूनही कधी आपल्याला त्याच्याबाबतीत वाईट किंवा चुकीचे ऐकायला मिळाले नाही. आपण खरेच नशीबवान आहोत. आपल्या मुलीही चांगल्या आहेत. त्या बापाच्याच वळणावर आहेत त्यामुळे त्या असं काही करणार नाहीत. आपल्या भूतकाळाचे सावट त्यांच्यावर पडले नाही. आपण।खरेच धन्य आहोत", असा विचार करत आई रात्रभर अंथरुणात डोळे मिटून जागी असते.
        इकडे बापही डोळे बंद करून आपल्या भूतकाळात डोकावतो. " आपण इतकी लफडी केली. शाळेत हुशार असल्याने लवकरच मिळालेली नोकरी, हातात असलेला पैसा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोड बोलून मुली पटवायच्या आणि फसवायच्या हा आपला गोरख धंदा झाल्याचे, त्यापायी मार खाल्ल्याचे, एक रात्रीत गबाळ गुंडाळून आपण कितीतरी ठिकाणाहून पळून आल्याचे आणि पळून पळून थकल्यावर कोणतीही चौकशी न करता सभ्यपणाचा आव आणून मित्राने आणलेले स्थळ म्हणून आपण काहीही चौकशी न करता हे लग्न केले. पण आपण इतके नालायक असूनही बायको मात्र आपल्याला अत्यंत चांगली आणि चारित्र्य संपन्न मिळाली. तिने कधीही आपल्यावर संशय घेतला नाही की भूतकाळ जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. खरंच आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला अशी सर्व गुणसंपन्न बायको मिळाली. आपण नालायकच आहोत पण आपली बायको चांगली असल्यामुळे आपल्या मुलींनी आपल्या आईचा आदर्श घ्यावा आणि तिच्या वळणावर जावे", अशी प्रार्थना वडील मनोमन करत असतात.     
        आई वडील असे जागे असताना मोठी मुलगी अचानक दचकून जागी होते. 'कमलासारखीच वेळ आपल्यावर आली तर काय करायचे', या विचाराने ती अस्वस्थ होते. तिलाही आपले महाविद्यालयात सध्या सुरू असलेले प्रेमप्रकरण आणि प्रियकर डोळ्यासमोर दिसायला लागतो. ती दुसरीला जागी करते. मग तिचीही झोप उडते. तिलाही आपले सध्या सुरू असलेले प्रेमप्रकरण आणि प्रियकर आठवतो. आपल्या बाबतीत असे झाले तर आपले एवढे देवगुणी आईबाप धक्का बसून मरून जातील किंवा आत्महत्या करतील असे त्यांना वाटायला लागते. शिवाय आपल्या प्रियकराने असे केले तर आपण त्यांना चांगला धडा शिकवू असेही त्यांना वाटायला लागते.
        आपल्या मुली जाग्या आहेत याची कुणकुण आई वडिलांना लागली की तेही गाढ झोपेतून उठून बसल्याचे नाटक करतात आणि त्यांना झोपायला सांगून चर्चा करत बसतात. काही गुपितं कायम मनातच ठेवण्यात सगळ्यांचे हित असते. त्यामूळे झाकली मूठ उघडायची नाही असा संदेश देत चित्रपट संपतो पण आपल्या मनात मात्र अनेक प्रश्न निर्माण करूनच!  ही चर्चा आणि गुपितं पहायची-ऐकायची आणि अनुभवायची असतील तर पंकज कपूर, आशालता, रुपा गांगुली, सुप्रिया पाठक, इरफान खान, मृणाल देव, यांच्या अभिनयाने नटलेला "कमला की मौत" एकदा का होईना पाहायलाच हवा!
©के.राहुल 9096242452
         

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...