कविता- रामा घरची चोरी.
रामा तुझें पैसे कोणी चोरले सांग,
दर्शनासाठी तुझ्या बघ लागली किती मोठी रांग.
भोळ्या भाबड्या तुझ्या भक्तांना काही कळत नाही यातलं,
तुझ्याच नावाने पोट भरून सांग कुणी मातलं.
स्वामी तिन्ही जगाचा म्हणे तू, असे कसे केले?
खरं सांग हे तुझ्या संमतीनेच तर नाही ना झाले!
मी असे बोललो म्हणून भक्त तुझे माझ्यावर भडकतील,
अधर्मी ठरेल मी आणि माझ्या खिडकीच्या काचासुद्धा तडकतील.
नास्तिक ठरवून मला ते यथेच्छ माझ्याशी भांडतील,
जुमानलो नाही मी तर माझे रक्त सुद्धा सांडतील.
का तू असाच नेहमी निवडक लोकांवर मेहेरबान असतोस,
दिवसाढवळ्या चोरी होताना मुद्दाम दार लावून बसतोस.
भक्तीचा तू भुकेला तुला इतका डामडौल कशाला?
निवडक लोकांचाच कसा तुझ्या दरबारी वशिला.
तुझे मला आता काही खरे वाटत नाही,
तुझ्या कर्तृत्वाची जरी कुणी किती दिली ग्वाही.
भक्तांना तुझ्या तू थोडी सद्बुद्धी दे,
दुःखे त्यांची थोडी तू तुझ्या पदरी घे.
काल तर रामा तू मला चक्क राजकारणी वाटलास,
आले भक्तांच्या मानत, मुक्काम तिथे थाटलास.
जाती धर्माचे स्तोम माजत असतांना खुशाल पाहत बसतोस,
भक्त असताना कष्टी खुशाल गालात हसतोस.
म्हणून तर तू मला मोठा चतुर वाटतोस
माणूस म्हणून विचार करणे मला गैर नाही वाटत,
अस्तित्वाची पटविण्या खात्री, मला तू एकदा तरी का नाही भेटत.
©के.राहुल 909642452
Comments
Post a Comment