नागवंश आणि महाराष्ट्र
प्राचीन काळातील नागलोकांचे वंशज आजचे बौद्ध (महार) आहेत, असे राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटले आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडे, प्र. न. देशपांडे, ह. श्री. शेणोलीकर, एच. एल. कोसारे, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनीसुद्धा वरील मतास पुष्टी दिली आहे. महारांच्या परंपरेनुसार महारांचा पहिला राजा नाग हा होता. नागलोक व नागराजे आपल्या नावात ‘नाग’ व ‘निका’ या शब्दांचा वापर करीत असत. चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या राणीचे नाव कुबेरनागा होते. कळलाय राजाच्या मुलीचे नाव ‘नागलिका’ होते. पद्मावतीला ‘भवनाग, भीमनाग, बृहस्पतीनाग, देवनाग, गणपतीनाग, प्रभाकरनाग व स्कंदनाग या नावाचे राजे होऊन गेले. यावरून बौद्ध तथा महार लोकांचे प्राचीनत्व लक्षात येते. महारांच्या नावावरून या देशाला महाराष्ट्र असे नाव पडले आहे. जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी उत्पत्ती दिली आहे. महार+राष्ट्र = महाराष्ट्र असे होते. या उत्पत्तीला अलेक्झांडर रॉबर्टसन, महात्मा जोतिबा फुले, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनीही या मताला दुजोरा दिला आहे.
कोकण हा प्रांत मुळात महार, मांग, भिल्ल, कोळी, ठाकूर व कोंग या लोकांचा होता. परंतु कदंबानी महारांचा, चालुक्यांनी मांगाचा व मौर्यानी कोळ्यांचा पराभव करून त्यांची राज्ये जिंकून घेतली. त्यामुळे या भूमीचे भूमिपुत्र बेवारस झाले. आठव्या शतकापासून जातीची बंधने घट्ट होऊ लागली. जेते लोकांनी जीत लोकांना गुलामासारखी वागणूक द्यावयास सुरुवात केली. नागवंशीय महार हे राज्यकर्ते होते. पण राजकीय पराभवातून ते हतबल, निष्कांचन व हीन अवस्थेला पोहोचले. याचा परिणाम एकमेकांच्या सहकार्याने चालत आलेल्या पंचायतराज वा गावगाड्यावरही झाला. शिवकाळात व विशेषत: पेशवेकाळातील बहुतांश निवाडे हे अस्पृश्य व दलित समाजाविरुद्ध एकतर्फीच झाल्याचे दिसून येते. पेशवेकाळात माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांना काही धरबंधच राहिला नाही, हा इतिहास आहे. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी पंचायत समिती स्थापन करून प्रबोधन कार्यास चालना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे भारतात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी चालना मिळाली. ठाण्यासह महाराष्ट्रातही सर्वच भागात बौद्ध लोक आहेत.
विद्यमान बौद्ध हे नागवंशीय असून ते या भूमीचे मूळ रहिवासी व राज्यकर्ते होते. आर्यपूर्व काळात नागलोकांची संस्कृती येथे अस्तित्वात होती. नागलोक म्हणजेच आजचे बौद्ध वा महार लोक होत. नागवंश हा भारतातील एक प्राचीन वंश आहे. प्राचीन काळात भारतात नागवंशाची राज्ये होती. ऋग्वेदात नागांचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे. देव, दानव, दैत्य, असूर व नाग ही कश्यपाची संतती असल्यामुळे ते परस्परांचे बंधू ठरतात. ऋग्वेदात उल्लेखलेला दास या शब्दाचा अर्थ आता गुलाम असा झाला आहे, परंतु या शब्दाचा मूळ अर्थ दाता, उदार असा होतो.
पुराणातील उल्लेखानुसार नागराजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी व पद्मावती या ठिकाणी राज्य केले. महाराष्ट्र ही तर नागांची मायभूमीच होती. दक्षिण भारतात नागांची अनेक लहान लहान राज्ये होती. महाराष्ट्रातील नागराजे ‘महारठी’ ही पदवी धारण करीत. सातवाहन काळात ‘कळलाय’ हा नागराजा कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करीत होता. त्याने आपली कन्या नागनिका हिचा विवाह सातवाहन राजा सिमुक सातकर्णीबरोबर केला होता. नागनिका ही सिमुक राजाची पट्टराणी होती. तिने अनेक यज्ञयागादी दानकर्मे केली. त्यासंबंधीचे कोरीव लेख नाणेघाटातील लयनगृहातील भिंतीवर पहायवास मिळतात.
Comments
Post a Comment