Skip to main content

इज लव्ह इनफ सर.....!

 इज लव्ह इनफ सर...!

प्रेम आणि दया यामध्ये फार कमी अंतर असते. अगदी दोन बोटांचे म्हटले तरी चालेल. फार कमी लोकांना त्यातील फरक लक्षात येतो. बऱ्याच वेळा तो अनेकांना समजतो पण काही काळ लोटल्यानंतर ! आपण दयेला प्रेम किंवा प्रेमाला दया समजत होतो हे समोरच्याने आपल्याबरोबर केलेली कृती होऊन गेल्यानंतर अनेकांना ते उमजते. घटना भूतकाळातील असेल तर वर्तमानकाळात त्याबाबत मिळणारा आनंद किंवा दुःख हे तितके सुखकारक किंवा त्रासदायक नसते तितका आनंद किंवा दुःख समोरच्या माणसाच्या वर्तमानकालीन कृतीने मिळणाऱ्या आनंद किंवा दुःखाने होतो. 

समोरच्या माणसाबाबत आपण केलेली कोणतीही कृती ही त्याला कशी वाटेल हे सांगणे तितकेच कठीण काम असते. त्यातही समोरच्या माणसाचा आणि आपला सामाजिक दर्जा म्हणजेच जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण आणि आर्थिक परिस्थिती काय आहे यावरून वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या त्यांच्याबाबतच्या कृतींचा अर्थ काढत असतात.  या विचाराला नेहमी एक तिसरा कोण जबाबदार असतो. म्हणजे व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंधावर परिणाम करणार आणि प्रभाव करणारा नेहमी एक त्रिकोण ठरलेला असतो. म्हणजे दोन व्यक्ती कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण, लिंग किंवा आर्थिक स्तरातील असो त्यातील 'तिसरा कोन' हा नेहमी समाज राहिलेला आहे.  आपल्या वागण्याकडे समाज कश्या पद्धतीने पाहतो यावरून आपण एकद्याबाबत केलेली कृती ही प्रेम आहे की करुणा हे ती व्यक्ती ठरवत असते.  अर्थात ती व्यक्ती तेवढी समजदार आणि प्रगल्भ असेल तर!

हा सामाजिक त्रिकोण भारतीय चित्रपटांनी सतत मांडलेला आहे. चित्रपटाची कथा कोणतीही असली तरी ती ज्या दोन प्रमुख पात्रांभोवती फिरत असते त्याचा तिसरा कोन हा नेहमीच त्यांच्या आजूबाजूला वावरणारी त्यांच्या ओळखी अनोळखीची माणसे असतात ज्याला आपण समाज असे म्हणतो. हा समाज अनेक चित्रपटातून खलनायक म्हणून थेट आपल्या अंगावर येत राहिला आहे. कारण तो विनाकारण त्या दोन पात्रांमध्ये लुडबुड करत असतो. प्रेक्षक म्हणून एक टप्प्यावर आपल्याला त्याचा रागही येतो. पण काही चित्रपटात हाच समाज अव्यक्त राहून किंवा त्या पात्रांबाबत कोणतीही कृती किंवा भाष्य न करता त्या पात्रांच्या वागण्यावर व निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकून जातो. ते ही आपल्या नकळत! असाच एक वेगळा आणि अव्यक्त राहूनही दोन व्यक्तींच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम करणारा चित्रपट म्हणजे "लव्ह इज इनफ सर! चित्रपटाच्या नावावरूनच तो दोन भिन्न सामाजिक दर्जा असणाऱ्या पात्रांचा चित्रपट असल्याचे लक्षात येते आणि तसा तो आहे. एक श्रीमंत घर मालक आणि त्याची साधी मोलकरीण यांची ही कथा आहे. घर मालक कर्तुत्ववान उद्योगपती आहे. परदेशात शिकून आलेला असल्यामुळे साहजिकच विचार चांगले आणि प्रगल्भ आहेत. साहजिकच तो स्वतंत्र विचाराचा आहे आणि त्याच शहरात आपल्या आईवडिलांपासून वेगळा राहतो आहे. घरात एक तरुण मोलकरीण आहे. पण त्याला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही. ती आपले काम इमान इतबारे करत असते. एकटा आहे म्हणून तो स्वैर होत नाही की तिच्याबाबत त्याच्या मनात कोणतीही वाईट भावना नाही. त्याची एक प्रेयसीही आहे. त्याला तिच्याशी लग्न करायचे आहे आणि पुन्हा अमेरिकेला जाऊन तिकडे आपला जम बसवायचा आहे. त्याचे आई वडील ही तिचे शिक्षण, सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक दर्जा पाहून संमती देतात. इकडे मालक लग्न करून परदेशात जाणार म्हणून मोलकरणीला नोकरीवरून काढून टाकले जाते. ती नोकरी गेल्याच्या दुःखात आपल्या गावी निघून जाते. पण इकडे लग्नाच्या दिवशी त्याची प्रेयसी दुसऱ्या मुलाबरोबर पळून जाते आणि त्याचे लग्न मोडते. आपण एवढे सरळमार्गी असताना आपल्याबाबत असे झाले याचे त्याला दुःख व्हायला लागते आणि आपला विश्वासघात झाला आहे ही भावना प्रबळ होते सहजीकच त्याचे एकाकीपणा वाढत जाते. तो घरात एकटाच रहायला लागतो. बाहेर जाणे, फिरणे, मित्रांसोबत बसणे उठणे बंद होते. त्याची आई त्या मोलकरणीला पुन्हा कामावर परत बोलावून घेते. तीही आनंदाने येते. त्याच्या गाडीचा ड्रायव्हर तिला सगळी माहिती देतो. तिला साहजिकच मालकाची काळजी वाटायला लागते. दारूच्या आहारी गेलेला आणि 24 तास घरात पडून असलेला मालक यांची काळजी घेण्यात तिचा दिवस जात असतो. पण मालक काही केल्या त्यातून बाहेर यायला तयार नसतो. मग ती स्वतः त्याला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. तो कधीही तिचा अपमान करत नाही सगळे ऐकून घेत असतो. इतके वर्षे आपल्याकडे असलेली मोलकरीण इतकी समजदार आहे आणि आपण तिला कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही याचे त्याला आश्चर्य आणि खेद वाटायला लागतो. तो पिणे सोडून तिच्याशी संवाद साधायला लागतो. अगदी ती स्वयंपाक करत असेल तर तो काहीतरी निमित्त करून किचनमध्ये जाऊन तिच्याशी गप्पा मारायला लागतो.  पण तो घरातून बाहेर पडायला आणि कामात गुंतवून घ्यायला तयार नसतो. तो तिला नेहमी "तू टिकली का लावत नाहीस, छान दिसशील!" असे विचारत असतो. पण ती नेहमी उत्तर द्यायचे टाळत असते. एके दिवशी ती आपल्या टिकली न लावण्यामागचे कारण सांगते.  तो पुरता हादरून जातो. ती शाळेतली सगळ्यात हुशार मुलगी. खूप शिकून तिला फॅशन डिझायनर व्हायचे असते. पण घरी खूपच गरिबी असते. त्यातच ती नववीत असताना मुंबईचे स्थळ आणि मुलगा हिरोसारखा दिसतो म्हणून घरचे तिच्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देतात आणि सहा महिन्यातच तीच्या नवऱ्याचे एड्स ने निधन होते. सासरचे घरातून हाकलून देतात. सासरी गेलेली मुलगी सहा महिन्यात विधवा होऊन परत घरी आली तर हिच्यासोबत धाकटीलाही असेच समजले जाईल आणि तिचे लग्न होणार नाही म्हणून हिला माहेरी यायची परवानगी नाकारली जाते. म्हणून ही मुंबईमध्येच मोलकरीण म्हणून काम करायला लागते. घरचे तिचे पैसे घेत असतात पण तिला घरात घ्यायला तयार नसतात. त्यातूनही ती आपल्यासाठी पैसे साठवून शिलाई मशीन घ्यायची आणि शिवण क्लासला जायची स्वप्ने पाहत असते. 

तिचा संघर्ष पाहून त्याला आपल्या दुःखातून बाहेर पडायची उर्मी मिळते. घरातील काम लवकर उरकून शिवण क्लास ला जायची परवानगी तो तिला देतो. तिच्यासाठी एक शिलाई मिशनची खरेदी करून आणतो. दोघांतील संवाद वाढायला लागतो. तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि हसू यायला लागते. मोठमोठ्या दुकानातील फॅशनेबल कपडे पाहून तसेच कपडे ती शिवायला लागते. स्वतः घालून पाहायला लागते. मालक तिला या कपड्यात नाचताना, गाताना पाहतो. ही आपल्या पात्रतेची आहे, हिला सर्व प्रकारची सुखे आणि आनंद मिळायला हवा असे त्याला वाटायला लागते. दुःखाचे निमित्त आहे म्हणून श्रीमंत आणि मोठ्या घरच्या मुलांसारखे इतर कोणत्याही मुलींबरोबर रात्र घालवायला त्याला नको वाटायला लागते. तिच्या बरोबर जास्त वेळ कसा घालवता येईल हे तो पाहतो. साहजिकच तिच्या सोसायटीतील तिच्या ओळखीच्या मोलकरणी, गाड्यांचे ड्रायव्हर आपापसात कुजबूज करायला लागतात. त्यातच तिचा त्याच्या नातेवाईकांकडून नकळतपणे अपमान होतो. तो तिच्या मदतीला धावतो हे कोणाच्याच नजरेतून सुटत नाही. तिला मात्र हे सगळे त्रासदायक वाटते. ती त्याला 'मी विधवा आहे, आमच्यात पुन्हा लग्न होत नाही' याची तर आठवण करून देतेच पण आपल्या दोघांचा सामाजिक दर्जा काय आहे? याचीही आठवण करून देते. तो थेट माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे सांगतो पण ती मात्र ते साफ नाकारते. त्याने केलेली आर्थिक मदत परत करून ती काम सोडून कायमची निघून जाते. याला खूप दुःख होते. पण दुःखात खचायचे नाही हे तो तिच्याकडूनच शिकतो. अमेरिकेला जायचा निर्णय घेतो पण जाता जाता तिने दिलेल्या आत्मविश्वासाची परतफेड म्हणून तिच्या नकळत तो एका फॅशन डिझायनरकडे तिला जॉब मिळवून देतो. तिला खूप आनंद होतो पण तिकडे गेल्यावर तिला हा जॉब आपल्या मालकानेच मिळवून दिल्याचे कळते. त्याच्याबाबत आपल्याही मनात प्रेम असल्याचे तिला त्याक्षणी उमगते. जॉबलेटर घेऊन ती थेट मालकाकडे जाते.  पण मालक अमेरिकेला जायला निघून गेलेला असतो. 

तिलोत्तमा शोम या नवख्या अभिनेत्रीने रत्ना या मराठमोळ्या मोलकाकरणीची भूमिका अत्यंत ताकतीने साकारली आहे. बंगाली असूनही तिने ग्रामीण ढंगाचे मराठी अत्यंत बेमालूमपणे बोलले आहे. विवेक गोम्बर या अभिनेत्याने अश्विन या मालकाची भूमिका साकारली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीला तो नवखा असला तरी तो हॉलिवूडमध्ये, दाक्षिणात्य चित्रपटातील नावाजलेला अभिनेता आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी 'कोर्ट' या चित्रपटासह 'द डिसिपल', 'दि प्रेसिडन्ट इज कॉमिंग', 'द मॉर्निंग फॉग', 'दि लेटर्स' यासारख्या अनेक हॉलिवूड चित्रपटात आणि काही दाक्षिणात्य चित्रपटात त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.कथेची गरज या गोंडस नावाखाली अश्लीलता दाखविण्यासाठी वाव आणि संधी असतानाही दिग्दर्शकाने तो मोह टाळला आहे. त्यामुळे साहजिकच कथा, पटकथा, अभिनय,  निर्मिती, आणि दिग्दर्शन या सगळ्या पातळीवर चित्रपट अतिशय दमदार झाला आहे. म्हणून मालक आणि मोलकरीण यांची प्रेमकथा सफल होते की नाही हे पाहण्यासाठी 'लव्ह इज इनफ सर' एकदातरी आवर्जून पहायलाच हवा!

©के. राहुल, 9096242452.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...