छद्मविज्ञानाची लक्षणे
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने दोन वर्षांसाठीच्या ज्योतिष विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करत असल्याची घोषणा केली. आपण शालेय जीवनापासून आपल्या मुलांना पृथ्वी हा फक्त ग्रह आहे, सूर्य हा लाखो किलोमीटरवर अंतरावरील फक्त एक तारा आहे हेच शिकवत आलो आहोत आणि आता त्याच मुलांना आपण पदव्युत्तर शिक्षणात सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि तो चंद्राच्या समांतर पातळीवर असतो हे शिकवणार आहोत.
भारतातील संख्येने 1000 च्या जवळपास असलेल्या विद्यापीठांपैकी 20 विद्यापीठात ज्योतिष विषयांतील अभ्यासक्रम शिकवला जातो. बनारस हिंदू विद्यापीठात संस्कृती भाषेशी संबंधित अनेक विभाग आहेत जेथे ज्योतिष विषय संस्कृतमधून अगोदरपासूनचशिकवला जातो. पण आताचा हा निर्णय एका वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या सामाजिक परिस्थितीत आलेला आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत IGNOU सारख्या नामांकित आणि मुख्य प्रवाहातील विद्यापीठाने घेतलेला ज्योतिष विषयातील पदवीला वरदहस्त दाखविणे हे पहिलेच उदाहरण आहे.
खरेतर ज्योतिष हा विषय दोन पातळ्यांवर चर्चिला जाणे आवश्यक आहे, पहिले म्हणजे आजच्या प्रगत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, आणि दुसरे म्हणजे ज्योतिषाच्या स्वतःच्या चौकटीतून! मुक्त ज्योतिष शास्त्र अस्तित्वात आले तेच मुळात माणसाने कालपरत्वे स्वतः निसर्ग आणि चराचर याबाबत करून घेतलेल्या समजातून ज्यात डोळ्यांनी जे पाहिले तेच सत्य आहे हे तत्व गृहीत धरलेले असते. यात विश्व म्हणजे फक्त पृथ्वी आणि माणूस याच बाबी लक्षात घेतलेल्या होत्या आणि आकाशाचा पसारा कुठपर्यत असेल यावर काहीच भर दिलेला नव्हता. त्या काळच्या लोकांना आकाश म्हणजे एक वेलबुट्टीदार नक्षीकाम केलेले कापड वाटत असे आणि आकाशातील तारे आणि त्यांच्या हालचाली माणसावर परिणाम करणाऱ्या आणि प्रभाव टाकणाऱ्या आहेत असे समजून महत्त्वाच्या वाटत असत. विशेष म्हणजे आकाशात होणाऱ्या सर्व प्रकारच्या हालचाली या दैवी संकेत वाटत असत. त्यामुळे दीड दोन हजार वर्षापूर्वीच्या समजांना आपण आजही कवटाळून बसणार असू तर ज्योतिष हे अंतिम सत्य असू शकत नाही. म्हणूनच ज्योतिष लोकप्रिय आहे म्हणून ते कायदेशीर असू शकत नाही किंवा ते पुरातन आहे म्हणून स्वीकाराहार्य आणि पवित्र असू शकत नाही.
अलीकडच्या काळात आपल्याकडे समाज दुटप्पी झाला आहे. एका बाजूला आमच्याकडे आय आय टी सारख्या प्रगत तंत्रज्ञान शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत म्हणायचे, जागतिक दर्जाच्या तोडीसतोड अंतराळ आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम आहे असे म्हणायचे, आपल्या देशातील विद्यापीठे जागतिक क्रमवारीत लक्षवेधी स्थानावर असावीत असे म्हणायचे, आपल्या शास्त्रज्ञांनी नोबेल पुरस्कार मिळविला पाहिजे अशी आशा करायची आणि दुसऱ्या बाजूला प्राचीन काळातील धोकादायक आणि निरुपयोगी गोष्टींना पाठबळ द्यायचे.
1862 मध्ये भारतातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्य आणि ज्योतिष तज्ञ बापू देव शास्त्री यांनी भारतातील ज्योतिष शास्त्र बदलत्या काळाबरोबर अद्ययावत केले पाहिजे असे जाहीर विधान केले होते. आपण आपल्या ज्योतिष विद्येचा अभिमान बाळगू शकतो पण जेव्हा विज्ञानाचा विषय येतो तेव्हा आपल्याला त्यांचे विज्ञान आणि आपले विज्ञान असा फरक करून चालणार नाही. विज्ञान हे सर्वत्र सारखे आणि ते आपण स्वीकारणे आणि स्वतःला अद्ययावत करणे आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. जागतिक विज्ञान विकसित होत असताना भारतातील अनेक ज्योतिष तज्ज्ञांनी अनेक गणिती समीकरणे मांडली आणि त्यांची ग्रहांच्या कक्षेत यशस्वीपणे उकलही केली होती.
अनेक संकल्पना मांडत असताना त्यांचा योग्य अर्थ लावणे आणि त्याबाबत तारतम्य बाळगणे आवश्यक असते. आपल्याकडे वैदिक ज्योतिषातील अनेक संकल्पना किंवा त्यातील सोयीचे वाक्यांश इस्लाम पूर्व काळातील ज्योतिष शास्त्राचा आधार घेऊन अत्यंत वरवरच्या अर्थाने वापरले जातात. आजचे शास्त्र आणि ख्रिस्त पूर्व 6 व्या शतकातील पिढ्यानपिढ्या चालत आलेले ज्योतिष शास्त्र यात आपल्याला फारकत करता आली पाहिजे. वैदिक ज्योतिषशास्त्र 27/28 तारे किंवा त्यांच्या गटाबद्दल भाष्य करते, ज्याला आपण नक्षत्र असे म्हणतो. त्यावरून आपण पृथ्वी, ग्रह, धूनकेतू इ. च्या स्थितीबाबत ठोकताळे बांधतो. राशीचक्र, साप्ताहिक राशिभविष्य आणि सद्या प्रसिद्ध असलेले विक्रमी कॅलेंडर हा त्या वैदिक ज्योतिष शास्त्राचा अविभाज्य भाग आहे. शिवाय हे संपूर्ण वैदिक ज्योतिष या ग्रह, तारे आणि नक्षत्र यावर अवलंबून आहे.
त्यानंतर मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरस्थित जिवाजी विद्यापीठाने ज्योतिष विज्ञान हे वैदिक गणित, वास्तुशास्त्र, हवामान शास्त्र अभ्यास, कृषी शास्त्र, अवकाश विज्ञान इ. क्षेत्रातील संशोधनासाठी नवीन परिमाण ठरेल अशी बतावणी केली. जिवाजी विद्यापीठाची ही कृती अप्रामाणिकपणाची असून 1500 वर्षांपूर्वीचे कालबाह्य शास्त्र अवकाश विज्ञानासारख्या आजच्या प्रगत विज्ञान शाखांशी सुसंगत आहे असे जबरदस्तीने बिंबवण्यासारखे आहे.
IGNOU ने हा अभ्यासक्रम सुरू करताना यामुळे भारतातील युवकांना नक्किच रोजगार निर्माण होईल असे आश्वासन दिले आहे. आणि त्यात तथ्यही आहे. पण हे योग्य आहे का? याचाही विचार व्हायला हवा! शासनमान्य आणि अधिकृत शिक्षण संस्था विशेषतः ज्या सरकारच्या मालकीच्या आहेत त्यांनी आपल्या मुलांना सध्याच्या जगात निर्माण झालेली आव्हाने आणि भविष्यात येऊ घातलेली आव्हाने यांचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या शिक्षण पद्धतीने बनावट, खोट्या आणि काळाच्या कसोटीवर कुचकामी ठरणाऱ्या कल्पनांचा प्रचार, प्रसार करता कामा नये जेणे करून लोकांच्या मनातील भीती किंवा असुरक्षितपणा त्यांच्या जगण्याचा आधार बनेल किंवा त्याला पाठबळ देता कामा नये.
जर खरेच भारत देशाला भविष्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्ती बनवायचे असेल तर सरकारने असल्या छद्मविज्ञानाला कोणत्याही परिस्थितीत पाठबळ देता कामा नये.
मूळ लेख: राजेश कोच्चर
(लेखक CSIR संस्थेतील खगोलशास्त्र या विषयाचे माजी प्राध्यापक आणि संचालक आहेत)
अनुवाद: के. राहुल, 9096242452
https://indianexpress.com/article/opinion/columns/this-is-whats-wrong-with-state-backed-educational-institutions-offering-courses-in-astrology-7427287/
Comments
Post a Comment