अकबर-बिरबल कथा ५२ - जिंकेल तो आपला!
अकबर बादशहा सकाळी सकाळीच दरबारात येऊन बसला होता. दरबारात कोणी आले तरी चीडचीड करत होता. त्यामुळे कोणीही दरबारात यायला तयार नव्हते. अकबराने सकाळची न्याहरीही उरकली नव्हती. वयोमानानुसार वेळेवर नाश्ता आणि जेवण करणे अपेक्षित होते. त्यामुळे बेगम साहिब चिंतेत होत्या. अकबराच्या आवडीचा साजूक तुपातला बदामाचा शिरा करूनही त्याकडे त्याने ढुंकूनही पाहिले नव्हते. अकबराला खाऊ तर घातलेच पाहिजे; पण त्यासाठी काय करावे हे बेगमला सुचत नव्हते. त्यामुळे बेगम अस्वस्थ होऊन आपल्या कक्षात येरझाऱ्या घालत होत्या. तेवढ्यात दासीने बिरबल दरबारात येत असल्याची वार्ता बेगमला कळविली. बेगमला त्यामुळे थोडा धीर आला. त्यांनी स्वतः जातीने जाऊन दरबारात जाणाऱ्या बिरबलाला मध्येच अडविले आणि त्याला सगळे रामायण ऐकविले. त्यावर बिरबलाने बेगमला विचारले, "महाराज गेल्या आठवड्यात आर्यवर्ताला गेले होते ना क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी! तेथे काही गंभीर घडले का?" होय, अनेक राज्याचे एकापेक्षा एक पारंगत क्रीडापटू तेथे आले होते. त्यामुळे आपल्या राज्यातील क्रीडापटू होतकरु असूनही अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. राजघराण्यातील युवकांची पाटी तर कोरीच राहिली. त्यामुळे बादशहा सलामत खूप चिडले आहेत, बेगम तोंडावरचा बुरखा सावरत म्हणाल्या.
राणीसाहेब शेवटी खेळ म्हटलं की हार जीत होणारच. त्यात एवढे चिडण्यासारखे काय आहे?
हे बेगम साहिबांना कळतंय पण बादशहा सलामतला कोण समजावणार!, बेगमची दासी मध्ये तोंड घालत म्हणाली.
बेगमची तगमग बघून बिरबल म्हणाला, राणीसाहेब तुम्ही काही काळजी करु नका. मी महाराजांचा राग आत्ता शांत करतो. आणा तो बदामाचा शिरा इकडे!
बिरबल दरबारात आल्याचे लक्षात येऊनही अकबराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. बादशहाच्या या वागण्याकडे दुर्लक्ष करत बिरबलाने बदामाचा शिरा अकबरासमोर ठेवला आणि म्हणाला, "महाराज ज्या गोष्टी मिळणे आपल्या हातात नाही; त्यासाठी दुःख करण्यात काही अर्थ नसतो. शिवाय यात कर्तृत्वाचाही भाग असतो. जय आणि पराजय यातील अंतर फार थोडे असते. त्यामुळे पुढच्यावेळेस आपल्या खेळाडूंनाही यश मिळेल".
तुझे म्हणणे खरे आहे बिरबलाला पण आपल्यापेक्षा लहान आणि गरीब राज्यातील खेळाडूंनाही चांगली पदके मिळाली आहेत. आमच्या राजघराण्याची पाटी तर पूर्ण कोरी राहिली. त्यामुळे आमची नातलगांमध्ये आणि मित्रमंडळींमध्ये चांगलीच नाचक्की झालीय. आता मी त्यांना तोंड तरी कसे दाखवू!
एवढीच अडचण असेल तर माझ्याकडे एक नामी उपाय आहे.
सांग बिरबला लवकर सांग!
महाराज आपण राजकारणात जे करतो तेच करायचे.
म्हणजे मी समजलो नाही.
म्हणजे आपल्या राज्यातील जे खेळाडू जिंकले आहेत ते सगळे राजघराण्यातील आहेत असे घोषित करा. त्यांना मोठेमोठे इनाम जाहीर करा. त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढा.
पण ते राजघराण्यातील नाहीत ना!
महाराज आपले मोठेपण आणि श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी असल्या गोष्टी कराव्याच लागतात. त्यातच राजकीय शहाणपण असते.
पण बिरबला राजघराण्यातील हरलेल्या लोकांचे काय करायचे?
महाराज त्यांची राजघराण्यातुन हकालपट्टी करा. त्यांच्या घरावर नांगर फिरवा आणि त्यांना शूद्र घोषित करा. म्हणजे त्यांना पुन्हा जिंकण्याचे महत्व कळेल तर कळेलच पण पुन्हा आपण श्रेष्ठ आहोत असे म्हणण्याची त्यांची हिम्मत होणार नाही.
पण बिरबला हे योग्य आहे का?
महाराज राजकारणात योग्य-अयोग्य असे काही नसते. जे काही असते ते म्हणजे राजघराण्याची प्रतिष्ठा, मानसन्मान आणि सत्ता राखणे हेच महत्त्वाचे असते.
बिरबलाचे बोलणे ऐकून अकबर एकदम खुश झाला आणि शिराच्या पहिला घास बिरबलाला भरविला. बिरबलाने शिरा खात खात पडद्याआड उभ्या असलेल्या बेगमकडे पाहून स्मितहास्य केले आणि बेगम हासत हासत आपल्या कक्षात निघून गेल्या.
©के.राहुल, 9096242452.
Comments
Post a Comment