खरा इतिहास
श्रीकृष्ण हा ऐतिहासिक पुरुष होता.होय बरोबर वाचलत, देव नाही ऐतिहासिक पुरुष.कृष्णाची तुलना केलीच तर ती फक्त शिवाजी महाराजांबरोबर होऊ शकते .कृष्णाचा इतिहास हा त्याच्या कपोलकल्पित चमत्कारांपेक्षाही अधिक रंजक आहे.नरहर कुरुंदकर यांनी व्यासांचे शिल्प या पुस्तकात कृष्णाचे ऐतिहासिक पुरुष म्हणून विवेचन केले आहे.कृष्णाची खरी ओळख व्हावी म्हणून हा त्यातील निवडक भाग खाली मांडला आहे.एका सामान्य मंत्र्याचा मुलगा ते राष्ट्रनिर्माता हा कृष्णाचा प्रवास थक्क करणारा आहे.हा इतिहास वाचल्यावर आपलं किती अज्ञान दूर झालं ही भावना मलातरी आली होती.
यादवांचे गणतंत्र आहे. ते कलोपजीवी, पशुप्रधान गणतंत्र आहे. हे मुद्दे आपण नीट लक्षात घेतले पाहिजेत. पशुप्रधान याचा अर्थ असा की, गोधन हे त्यांचे मुख्य धन. त्यामुळे गाईची विक्री, बैलाची विक्री, दुधाची विक्री हा मुख्य उद्योग. शेती अनुषंगाने आलीच. हे जे पशुप्रधान, गोपालप्रधान अशा प्रकारचे यादवांचे गणतंत्र आहे; त्याच्यात भोज, अंधक असे छोटे-छोटे गट आहेत. या गटांचे मिळून हे गणतंत्र आहे. हे जे गणतंत्र श्रीकृष्णाच्या काळापासून चालत आलेले आहे, त्याचा एक नेता कंस आहे. शेजारी जरासंधाचे राज्य मगधामध्ये आहे तो आजूबाजूचे राजे मांडलिक करतो, आजूबाजूची गणतंत्रे बुडवतो, गणतंत्र बुडवण्याला साह्य करतो; कारण त्याला साम्राज्यनिर्मिती करायची आहे. या जरासंधाच्या मुली कंसास दिल्या आहेत. या कंसाने यादवांचे गणतंत्र बुडवून स्वतःची राजेशाही निर्माण केली. जोपर्यंत यादवांचे गणतंत्र चालू होते तोवर गणसभा होत्या, त्यांचे मंत्रिमंडळ होते आणि या मंत्रिमंडळातील एक मंत्री आहे वसुदेव श्रीकृष्णाचा बाप! गणतंत्राचा मंत्री असल्याने, ते बुडाल्यावर त्याचे मंत्रिमंडळ गेलेले आहे. त्यामुळे ते मंत्रिमंडळ पुन्हा स्थापन व्हावे, यासाठी धडपडणाऱ्या मंडळींपैकी तो एक आहे. या वसुदेवाच्या दहा-अकरा बायका आहेत. संतती भरपूर आहे. वसुदेवाच्या सगळ्या बायकांची नावे हरिवंशात आलेली आहेत. त्यांतल्या काही बायका मथुरेत आहेत, काही त्याच्याशेजारी गोकुळात यमुनेच्या पलीकडे आहेत. हा स्थानबद्धतेत आहे, कैदेत नाही. स्थानबद्धतेत असल्याने मथुरा सोडून जायचे नाही, हा आदेश गुंडाळून अधून-मधून तो गोकुळात जातो; म्हणून बलरामाचा जन्म झालेला आहे, नाही तर बलरामाचा जन्म व्हायचे काही कारण नाही.
यादवांच्या राज्यात गणतंत्र पुन्हा स्थापन करून राजेशाही बुडवावी कशी, याचा विचार चालू आहे. राजेशाही बुडवून गणतंत्र स्थापण्याचा प्रयत्न केला, तर जरासंधाच्या फौजा मथुरेवर तातडीने चाल करून येतील, त्याचे उत्तर कसे द्यावे, याचाही विचार चालू आहे. हा विचार चालू असताना जुन्या गणतंत्राच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री वसुदेव, ज्याच्या अनेक बायकांपैकी एक बायको देवकी जिच्या पोटी श्रीकृष्ण नावाचा मुलगा जन्माला आलेला आहे. उरलेले सर्व काव्य ! आठवे मूल होते, नववे मूल होते... आकाशवाणी झाली, ही अशी मुले मारली, तशी मुले मारली... याचा तुरुंगात जन्म झाला... त्याच्या पायाचा स्पर्श झाल्यावर बेड्या- तुटून पडल्या हे काव्य! काव्य चांगले आहे. त्याचा काव्य म्हणून आस्वाद घ्यायला काहीच हरकत नाही. काव्याचा आस्वाद घेत जावा माणसाने आपला सुसंस्कृतपणा जतन करण्यासाठी ते उपयोगी पडते. पण ते काव्य आहे, इतिहास नाही; हे लक्षात घ्यावे.
श्रीकृष्ण जेव्हा तरुण झाला- सोळा-सतरा वर्षांचा झाला, तेव्हा गणतंत्र पुनरपि स्थापन करावे असे म्हणणाऱ्या गटाचा तो नेता झाला. मूळ महाभारतात
श्रीकृष्णाने युधिष्ठिराला समजावून सांगितले की, राजसूय यज्ञ करणे कसे आवश्यक आहे. पण जरासंध मेल्याशिवाय राजसूय यज्ञ करणे शक्य नाही. तेव्हा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले, “या जरासंधाची तुला काय माहिती आहे?" तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, "मला जितकी माहिती आहे, तितकी कोणालाच असणार नाही. अरे, या जरासंधाचा जावई कंस- याचे राज्य चालू ठेवणे आम्हाला परवडणारे नव्हते आणि
त्याचे राज्य बुडवून टाकले, तर त्याच्या अनेक फौजा आमच्यावर चाल करून येतील. त्यांच्याशी तोंड द्यायची आमची ताकद नव्हती! या चिंतेत अनेक वर्षे गेली. शेवटी मथुरेच्या आत असणारे आमचे मित्र यांनी ठरवले की, कंसाचा वध करायचा. म्हणून सर्वांच्या संमतीनुसार जी मंडळी कंसाचा वध करायला गेली,
त्यांचे नेतृत्व मी केलेले आहे!"
हे जे कृष्णाचे वाक्य आहे, ते 'आठव्या वर्षी श्रीकृष्णाने कंसाचा वध केला', हे सांगणारे नाही! ते थोडेसे शिवाजीशी मिळते-जुळते दिसते. श्रीकृष्ण हा सतरा
अठरा वर्षांचा होता. कंसाला त्याने मारले. कंसाला मारल्याबरोबर तुम्ही जर पुन्हा गणतंत्र आणणार असाल, तर जरासंघाच्या फौजा मथुरेच्या बाजूने येणार! म्हणून ती कहाणी अशी आहे की, कंसाला मारल्यानंतर श्रीकृष्णाने वसुदेवाला बंदीखान्यातून
सोडवले, पण राज्य उग्रसेनाला दिले. राजा उग्रसेन झाला आणि उग्रसेनाची सत्ता पुनरपि स्थापन झाली!
श्रीकृष्णाचेच यादवांच्या घरात चालते, कारण तो त्यांचा सर्वांत मोठा लोकप्रिय नेता आहे. जो मुद्दा कृष्ण मांडील, त्या मुद्द्याला त्याच्या संसदेमध्ये बहुमत मिळते. त्यामुळे मंत्रिमंडळ कोणाचेही असले तरी नाड्या त्याच्या हातात आहेत. त्याला गादीवर बसण्याची गरज नाही. आपल्या स्वातंत्र्यलढ्यातल्या
महात्मा गांधींची जी भूमिका आहे, त्याच्याशी मिळती-जुळती अशी ही भूमिका आहे हे आपण लक्षात घ्या. श्रीकृष्णाने सांगितले की, कंसाला मारले की जरासंधाचा हल्ला होणार. जरासंघाचा हल्ला झाला. श्रीकृष्णाने मोठ्या पराक्रमाने
त्याचा हल्ला परतवला आणि आपल्या मंडळींना सांगितले की, "जरासंघाला अंदाज आला नाही आपली ताकद किती आहे याचा! म्हणून छोट्या फौजा आल्या. आपण त्या परतवून लावल्या, पण यानंतर मोठ्या फौजा येतील. जरासंधाच्या फौजांसमोर आपण टिकू शकणार नाही. संबंध यादवांना पुन्हा एखादा राजेपण कबूल करावे लागेल; नसेल तर त्यांना संपूर्ण वंशासकट नष्ट होईपावेतो मरावे लागेल!याला पर्याय आहे भूमीचा त्याग! म्हणून श्रीकृष्णाने आपले लोक उचलले, ती मथुरा-गोकुलाची भूमी सोडली आणि तो नव्या भूमीचा शोध क्रमाने घेत पश्चिम समुद्राच्या काठी द्वारकेला येऊन स्थिर झाला.
कृष्ण हा मथुरेत असेल, तर जरासंधाचे हवे होतात. जरासंधाला द्वारकेवर हल्ला करायला काय हरकत आहे ? जरासंघ द्वारकेवर हल्ले करू शकत नाही. कारण जरासंधाला द्वारकेवर हल्ले करायचे असेल, तर मधले कुरूंचे राज्य ओलांडावे लागते आणि कुरु हेसुद्धा स्वतःचे राज्य निर्माण करताहेत. त्या काळात कुरूंचा नेता आहे भीष्म ! भीष्माच्या नेतृत्वाखाली कुरूंचे राज्य आहे. पांडव कौरव अजून वयात आलेले नाहीत. त्यांचे आपापसांत धिंगाणे चालू आहेत. भीष्माशी लढाई करायची, कुरुंचे राज्य बुडवायचे आणि द्वारकेवर जायचे - एका पिटुकल्या राज्यासाठी एवढी किंमत जरासंघ देणार नाही, हा श्रीकृष्णाचा अंदाज असल्याने जरासंधाच्या राज्याजवळ असलेले राज्य त्याने सोडले आणि तो द्वारकेला आला. द्वारकेला आल्यावर सर्व तंत्र बदलले. कारण गोधनावर आधारलेल्या गणतंत्राजागी आता पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावर व्यापारावर आधारलेले नवे गणतंत्र निर्माण करावे लागणार. द्वारका, ओखा, द्वग, कच्छ ही पश्चिम किनाऱ्यावरील प्राचीन प्रमुख केंद्रे आहेत. म्हणून आता नव्या गणतंत्राची मांडणी आयात-निर्यात व्यापाराच्या आधारे झाली. त्यामुळे गणतंत्रच बदलले राज्यरचना बदलली, मांडणी बदलली. द्वारकेमध्ये यादवांना समृद्ध आणि वैभवशाली जीवन उपलब्ध झाले. म्हणून द्वारका सोन्याची आहे, कारण ते गोपालकांचे गणतंत्र आहे. द्वारका सोन्याची आहे. कारन ते व्यापाऱ्यांचे गणतंत्र आहे.
इतिहासात जो श्रीकृष्ण आहे तो मोडलेले गणतंत्र पुन्हा एकदा स्थापन करणारा प्राचीन गणतंत्राचा नेता म्हणून आहे. दरिद्री गणतंत्र नव्या भूमीवर नेऊन वैभवशाली गणतंत्र निर्माण करणारा, आपल्या राष्ट्राच्या वैभवाची पायाभरणी करून ते सगळे वैभव निर्माण करणाऱ्यांचा नेता म्हणूनही आहे. पण इथे जरी बसले असला, द्वारकेत जरासंध जरी येऊ शकत नसला तरी जरासंधाचे मित्र त्याच्यावर हल्ले करतातच. म्हणून आपल्याला द्वारकेच्या इतिहासात कालयवनाचा हल्ला आणि श्रीकृष्णाने त्याचा केलेला पराभव, पौड़ांचा हल्ला या घटना दिसतात. हे सगळे जरासंधाचे मित्र, छोटे छोटे मांडलिक राजे आहेत. त्यांनी द्वारका बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्रीकृष्ण त्या सगळ्यांना पुरून उरलेला आहे. पण तुम्ही कितीही पुरुन उरलात तरी जोपर्यंत जरासंघ जिवंत आहे, तोपर्यंत द्वारका सुरक्षित नाही, हे समजण्याइतका श्रीकृष्ण चाणाक्ष आहे. आणि जरासंघाला मारायचे असेल, तर आपल्यालाही हाताशी एक साम्राज्य पाहिजे.
कौरवांचे साम्राज्य जवळ आहे. पण त्यांच्याशी यादवांनी मित्रत्व केले, तर यादवांना कौरवांचे मांडलिक म्हणून राहावे लागेल; म्हणून ज्यांच्या हातात राज्य आहे, त्यांची बाजू घेण्याची श्रीकृष्णाची धडपड नाही. ज्यांच्या हातात राज्य नाही, त्यांची बाजू घेऊन आपल्या मदतीने त्यांना राजे करण्याची आहे; म्हणजे मैत्री होते. राजकारणामध्ये बलवान आणि दुबळे यांची मैत्री म्हणजे एकाचे स्वामित्व, दुसऱ्यांचे मांडलिकत्व! आमच्या ताकदीवर तुम्हाला राजे करतो, या जोरावर
मित्रत्व! म्हणून कृष्णाने पांडवांचे मित्रत्व स्वीकारून पांडवांना राजे करणे हेच बरोबर आहे आणि पांडवांना कोणी तरी मदतनीस पाहिजे म्हणून त्यांनी कृष्णाला
मदतनीस घेणे हे बरोबर आहे. नाही तर कृष्णाला कौरवांचे मित्र होता आले असते, पण कौरवांच्या मित्रत्वात त्याला त्यांचा मांडलिक व्हावे लागले असते. पांडवांच्या निमित्ताने कौरवांची प्रतिस्पर्धी सत्ता निर्माण करता येणे शक्य आहे, हे लक्षातआल्यानंतर द्रौपदी स्वयंवराच्या निमित्ताने पांडवांना श्रीकृष्ण भेटला.
त्याच्या आधी तो पांडवांना भेटतच नाही! कारण त्याच्याआधी द्वारका सुरक्षित नव्हती, जीवन सुरक्षित नव्हते; मथुरेत सुरक्षित नव्हते, द्वारकेत सुरक्षित नव्हते मग पांडवांना भेटून काय करायचे? म्हणून पांडव आणि श्रीकृष्ण यांच्या मैत्रीचा पाया दोघांची राजकीय गरज यातून भरला आहे. मग 'द्रौपदीशी बंधु शोभे नारायण!' हे सगळे काव्य! हे जे काव्य आहे ते चांगले आहे. ते वाचावे, त्याचा अभ्यास करायला काहीच हरकत नाही. श्रीकृष्ण परमात्मा मानल्यानंतर मग त्याच्या भक्तीच्या कहाण्या सुरू होतात.
एकदा पांडवांनी इंद्रप्रस्थाचे राज्य ताब्यात घेतले की, खांडववन जाळून पांडवांना मुक्त करणे आणि पांडवांना सांगणे की, तुम्ही राजसूय यज्ञ करा. पण
राजसूय यज्ञ करायचा असेल तर जरासंधाला मारल्याशिवाय गत्यंतर नाही. जरासंधाला मारण्याची जबाबदारी पांडवांच्या गळ्यात श्रीकृष्णाने अडकवली आहे. पण त्यातही वैशिष्ट्य आहे. श्रीकृष्ण लढवय्या आहे, पराक्रमी आहे, तसाच तो शूर आहे, धाडसी आहे. पांडवांनी जरासंधाला मारावे, असे त्याचे म्हणणे नाही. पांडवांनी जरासंधाला कसे मारावे, हे तो सांगतो; 'मी बिनधोक होईन', हे तो सांगत नाही. मग तो जरासंधाला मारायला निघाला. कसा निघाला? अर्जुन, भीम, कृष्ण हे जरासंधाकडे गेले. महाभारतात याचे वर्णन आहे. हे जरासंधाकडे गेले व त्याला
सांगितले की, आम्हाला युद्धभिक्षा पाहिजे. मग श्रीकृष्ण जरासंधाला भीमाशी लढवतो. एकवीस दिवस भीम व जरासंध यांचे युद्ध झाले, पण जरासंध थकेचना तेव्हा श्रीकृष्णाने हळूच भीमाला सांगितले की, पायापासून चीर- म्हणजे इकडचा तुकडा इकडे, तिकडचा तुकडा तिकडे! मग जरासंध मेला !
एकदा जरासंघ मेला आणि त्याचा मुलगा सहदेव मांडलिक झाला की, पांडवांच्या राजसूय यज्ञाची वाट मोकळी झाली. पांडव सम्राट झाले ते मदतीने. पांडव सम्राट होत असताना द्वारका सोन्याची झाली, सुरक्षित झाली ती कृष्णाच्या कृष्णाच्या धोरणाने! म्हणून हे एका राष्ट्रनिर्मात्याचे चरित्र आहे.
एका कर्तबगार नेत्याच्या आधारे दरिद्री, सामान्य, कलांच्या परंपरा, नृत्यांच्या परंपरा असणाऱ्या गोपालकांच्या गणतंत्राचे वैभवशाली द्वारकेत रूपांतर. एका मुत्सद्दी नेत्याच्या जोरावर जुन्या साम्राज्याची समाप्ती, नव्या साम्राज्याचा आरंभ हा कृष्णचरित्रातला मानवी ताकदीचा, शक्तीचा विलास दाखविणारा भाग आहे. एक सम्राट, एक मुत्सद्दी एक राज्य बिनधोक करू शकतो; पण राज्य बिनधोक झाले म्हणजे माणसे बेजबाबदार होतात. त्यांचा नाश असाधारण शक्तीचा युगपुरुषही टाळू शकत नाही! हा कृष्णाच्या मर्यादिचा भाग आहे. या राज्यात पैसा भरपूर आहे, संपत्ती भरपूर आहे. भोगाची साधने भरपूर आहेत आणि भीती कोणाचीच राहिली नाही! ते आपापसांत मारामाऱ्या करीतच राहणार! तेही कृष्णाने भोगलेले आहे, म्हणून कृष्णाचे चरित्र लक्षात घेऊन त्या जुन्या काळात श्रीकृष्ण हा समाजाचा एक आदर्श नेता म्हणून लोकांसमोर उभा राहिला अन् मग त्याच्या कौतुकाची गाणी सुरू झाली, त्याबरोबर नानाविध कहाण्या आल्या. मग हा श्रीकृष्ण देव मानला जाऊ लागला. एकदा देव मानला की, मग तो तत्त्वज्ञानाचा प्रवक्ताही मानला जाऊ लागला. पराक्रमी पुरुष, आदर्श नेता, हीरो, जवळजवळ देव, पूर्ण देव, परमेश्वर, तत्त्वज्ञानाचा प्रवक्ता, अनासक्त, वैराग्यशाली कलांचा आधार असे क्रमाने चरित्र वाढत चाललेले आहे. पण पुढचा संबंध विकास आपण काव्य म्हणून बाजूला सारला; तरी ते एका अफाट कर्तृत्व असणाऱ्या, असामान्य संयम अनासक्ती असणाऱ्या असामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एका गणतंत्राच्या निर्मात्याच्या प्राचीन नेत्याचे चरित्र आहे. म्हणून पाणिनीने असा उल्लेख केलेला आहे की, जुनी ऐतिहासिक माणसे कधी तरी लोकांना प्रिय होत ईश्वरच होऊन जातात. याचे सगळ्यांत चांगले उदाहरण म्हणजे वसुदेव व अर्जुन! आता त्यांची पूजा व्हायला लागली आहे; कारण पाणिनीला हे माहीत आहे की हा इतिहासातला माणूस असून आता लोक याला देव मानायला लागले आहेत.हा जो कृष्ण आहे, तो आपण समजून घ्यायला पाहिजे.
नरहर कुरुंदकर - व्यासांचे शिल्प
Comments
Post a Comment