Skip to main content

दहाड: साखळी हत्याकांडा (सिरीयल किलींग) मागील मानसिकतेचे प्रभावी चित्रण:

 साखळी हत्याकांडा (सिरीयल किलींग) मागील मानसिकतेचे प्रभावी चित्रण:

रॉबर्ट रेसलर हे अमेरिकेतील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन अर्थात एफबीआयचे एक सन्माननीय आणि तज्ञ सदस्य. 1982 साली त्यांनी साखळी हत्याकांडातील गुन्हेगारांच्या मानसिकतेवर सखोल संशोधन करून त्याआधारित गुन्हेगारांची मानसिकता हा सिद्धांत मांडला. त्यानुसार सिरीयल किलरच्या मानसिकतांचा अभ्यास करताना जे वेगवेगळे सिद्धांत त्यांनी मांडले त्यामध्ये अमेरिकेत आणि इतरत्र झालेल्या साखळी हत्याकांडांमध्ये विविध गुन्ह्यांचे स्वरूप आणि गुन्हेगारांची मानसिकता त्यांनी अभ्यासली आणि त्यानुसार गुन्हेगारांच्या वर्तणुकीचे सखोल विश्लेषण त्यांनी केले. त्यामध्ये बहुतांश गुन्हेगार साखळी हत्याकांड घडवून आणत असताना अत्यंत थंड डोक्याने हे काम करत असतात असे त्यांना आढळून आले. यातील बहुतांश गुन्हेगारांचा  सामाजिक आणि आर्थिक स्तर उच्च असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ज्या कुटुंबांमध्ये आर्थिक सुस्थिती बरोबरच कौटुंबिक दुभंग जास्त आहे अशा कुटुंबातील मुले साखळी हत्याकांडातील गुन्हेगार असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लहानपणापासून समाजात आणि कुटुंबात वावरत असले तरी आपल्या लोकांच्या सहवासात असूनही काही कारणाने या व्यक्ती एकलकोंड्या मानसिकतेच्या असतात आणि त्यातूनच त्या विशिष्ट व्यक्ती किंवा घटकांबद्दल चीड बाळगून असतात. ही चीड दीर्घकाळ टिकून राहिली किंवा त्यावर पालकांनी समाधान शोधले नाही किंवा  उपाय करूनही यश आले नाही तर मुले लहानपणापसूनच  अधिकाधिक हिंस्र होत जातात. या हिंस्रपणाला बुद्धिमत्तेची जोड मिळाली की मग ती अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आणि कोणालाही संशय न येता गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी तयार होतात. आपल्या आजूबाजूच्या आणि जवळच्या लोकांना आपल्या या कृत्याचा संशय येऊ नये किंवा माग लागू नये म्हणून ते नाईलाजाने का होईना त्यांच्याशी अत्यंत चांगले वर्तन करतात. बऱ्याच वेळेला कौटुंबिक पातळीवर या व्यक्ती आदर्श व्यक्ती म्हणून वावरत असतात. आपले आई, वडील, पत्नी आणि मुले यांच्यासाठी या व्यक्ती आयडॉल म्हणून काम करत असतात. तसेच यातील बऱ्याच व्यक्ती सामाजिक जीवनात वावरत असताना अत्यंत सभ्य, सुसंस्कृत आणि सामाजिक भाव बाळगून असतात. आपल्या जवळच्या लोकांच्या प्रती सहकार्याची भावना, प्रेम आणि आदर असल्याचे दाखवत असतात. साहजिकच या जवळच्या लोकांना ही व्यक्ती असे काही करेल याचा अंदाजच येत नाही किंवा कोणी त्याच्याबाबत काही विपरीत सांगितले तरी लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत. इतका या गुन्हेगारी प्रवृत्तींनी आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आणि समाजावर प्रभाव पडलेला असतो. त्यातूनच या व्यक्ती जे सांगतील त्यावर या व्यक्तीच्या प्रभावाखाली असलेल्या लोकांचा सहज विश्वास बसतो. सार्वजनिक आयुष्यात या व्यक्तींचे वजन वाढलेले असते. साहजिकच त्यांच्याबद्दल कोणी काही विपरीत बोलले तरी त्या व्यक्तींच्या अगोदरच समाजच त्यांची ढाल बनवून पुढे उभा राहतो आणि ज्या व्यक्तीला या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांबद्दल संशय आलेला असतो त्या व्यक्तीही आपण याच्याबद्दल काही चुकीचा विचार करतोय या न्यूनगंडामध्ये अडकत जातात. त्यामुळे या व्यक्तींची गुन्हेगारी कृत्ये राजरोसपणे सुरू असतात. 

रॉबर्ट  रेसलर यांनी जॉन डग्लस या दुसऱ्या अत्यंत प्रतिष्ठित आणि तज्ञ मानसशास्त्रज्ञाच्या सहाय्याने हा सिद्धांत मांडला आणि तो सर्वमान्यही झाला. या गुन्ह्यांमध्ये ज्या ज्या व्यक्तींचा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने खून केला जातो त्या व्यक्तींमध्ये विलक्षण साम्य असते हे साम्य त्या व्यक्तीचे वय, लिंग, आर्थिक परिस्थिती, विशिष्ट प्रकारचे वागणे, विशिष्ट प्रकारचा पेहराव, वर्ण, जात, धर्म किंवा अगदी शारीरिक ठेवण, केसांचा रंग किंवा कपड्यांची रंगसंगती या गोष्टीही त्यासाठी जबाबदार असतात असे रेसलर आणि डग्लस यांचा सिद्धांत सांगतो.

रीमा कागदी आणि झोया अख्तर या हिंदी चित्रपट सृष्टीतील मोजक्या आणि अत्यंत ताकदीच्या कथा, पटकथाकार आणि दिग्दर्शिका म्हणून प्रसिद्ध पावलेल्या जोडीची वेब सिरीज नेमकी याच मानसिकतेचे नेमके दर्शन घडवणारी आहे. यासाठी दिग्दर्शकांनी राजस्थानची निवड केलेली आहे. भारतातील हिंदी पट्ट्यातील निवडक मागास राज्यांमधील राजस्थान हे राज्य! हे आजही सर्व बाबतीत एक मागास आणि बीमारू राज्य समजले जाते. या मागासलेपणामध्ये जसे आर्थिक मागासलेपण आहे तसेच ते जात, धर्म आणि लिंग याबाबतीत वैचारिक पातळीवर ही आजही तितकेच मागास आहे. साहजिकच हे मागासलेपण अत्यंत प्रभावीपणे दाखवत असताना दिग्दर्शकांनी सध्याचे ज्वलंत विषय जसे की जातीभेद, लिंगभेद आणि धर्मभेद या मुद्द्यांचा अत्यंत प्रभावी वापर करून आठ भागांची ही वेब सिरीज तयार केली आहे. ज्यामध्ये राजस्थानातील एका जिल्ह्यातील मागास जातीतील विशिष्ट वयोगटातील मुली अचानक गायब व्हायला लागतात आणि नंतर एका समान पद्धतीने त्यांची कोणीतरी हत्या केल्याचे लक्षात येते. साहजिकच गुन्हेगार हा उच्चभ्रू सुशिक्षित आणि वरच्या जातीतील असल्याने कोणाला त्याच्यावर संशय येत नाही. त्यातच तो समाजसेवेचे विशेषता गरीब आणि अनाथ मुलांना शिक्षण देण्याचे महान कार्य करत असल्याने त्याची समाजामध्ये, प्रशासकीय यंत्रणा, पोलीस आणि राजकीय व्यक्तींमध्ये उठबस आहे. त्याच्याबद्दल या लोकांमध्ये आदर आणि सन्मानाची भावना आहे. दुसऱ्या बाजूला तो आपण अत्यंत कुटुंबवत्सल, प्रेमळ आणि सहकार्याची भावना असणारे आहोत असे बायको आणि मुलगा यांना सतत दाखवून  देत असतो. बायकोचे बाहेर विवाहबाह्य संबंध आहेत हे कळल्यावरही तो तिला उदार मनाने माफ करतो. त्यामुळे आपला मुलगा, पती किंवा बाप असा असूच शकत नाही याची शंभर टक्के खात्री आणि विश्वास त्याच्या आई-वडिलांना, बायकोला आणि मुलांना आहे. आपली कृत्ये लपून राहण्यासाठी  त्याने कुटुंब आणि समाजाची ढाल केल्यामुळे तपासयंत्रणाही याबाबत पूर्ण गाफील असतात आणि रोज पोलिसांच्या डोळ्यासमोरून वावरत असणारा हा गुन्हेगार ठराविक अंतराने राजरोसपणे आणि शिताफीने आपले काम करत राहतो 

दुसऱ्या बाजूला ज्या मुली याच्या दुष्कृत्याचा बळी पडतात त्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या खालच्या वर्गातील असून कुटुंबातील व्यक्तींनाही नकोशा झालेल्या आहेत. मुलगी जन्माला आली की तिला दुधात बुडवून मारण्याची सर्वमान्य परंपरा असलेल्या या राज्यात मुलगी लहानपणी यातून वाचली तरी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यास या मुलींची लग्ने करण्यासाठी मोठ्या रकमेचा हुंडा देण्याचे सामर्थ्य कुटुंबाकडे नसल्यामुळे कुटुंबाला या मुलींचे ओझे झालेले असते.  त्यातून जन्म देती आईसुद्धा त्यांच्याशी नीट वागत नाही. अशा परिस्थितीत या मुलींचा आपल्या कुटुंबाशी असलेला संवाद पूर्णपणे थांबलेला असतो. अशा मुलींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे कसब हा गुन्हेगार बाळगून असतो आणि त्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधून तो त्यांच्याशी भावनिक नाते तयार करतो. वेगवेगळी नावे धारण करून तो त्यांना आपल्या जाळ्यात ओढतो. जगाचा कोणताही अनुभव नसलेल्या या मुली त्याच्या आमिषाला बळी पडतात आणि घरात कोणालाही काहीही न सांगता त्याच्याबरोबर निघून जातात. आपल्या मागची ब्याद गेली म्हणून ते कुटुंबही मग निश्चिंत होते. 

गुन्हेगाराच्या या हुशारीमुळे पोलीस यंत्रणा चक्रावून जातात. जयपुर सारख्या शहरात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये लागोपाठ इतकी मुलींची हत्याकांडे होऊनही गुन्हेगार सापडत नाही. मुलगी घरातून पळून गेली हे समाजाला कळाले तर बदनामी होईल या भीतीने कोणतेही कुटुंब त्याबाबत तक्रार करायला समोर येत नाही. हा जसा महत्त्वाचा मुद्दा तसेच जर कोणी तक्रार करायला गेले तर पोलीस तक्रार घेत नाहीत म्हणून हतबल असणारे एखाद्या कुटुंबातील लोकही येथे आहेत. तसेच या मुलींच्या हत्याकांडामागे आपल्याला काही राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजता येईल का? या शोधात असलेला राजकारणी ही आहे. तो या प्रकरणाला लव - जिहादचे स्वरूप देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये यशस्वी ही होतो. साहजिकच प्रकरणाला हिंदू विरुद्ध मुस्लिम असे स्वरूप प्राप्त होते. दरम्यानच्या काळात गावातील प्रसिद्ध अशा ठाकूर घराण्यातील मुलगी आपल्या मुस्लिम प्रियकराबरोबर पळून जाते आणि सर्व गायब झालेल्या मुली आणि त्यांचे झालेले खून यामागे मुस्लिम युवक आहेत अशी आवई उठवली जाते. यामुळे संपूर्ण प्रकरणाचा नूर पालटून जातो. चौकशीची दिशा भरकटते. या मुलींच्या चौकशीसाठी महिला पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते.  परंतु महिला पोलीस अधिकारी मागासवर्गीय आहे याचे कारण दाखवून तिला घरात घेण्याचे टाळले जाते. साहजिकच प्रकरणाच्या चौकशीला खीळ तर बसतेच पण या प्रकरणावरून हिंदू-मुस्लिम, सवर्ण-मागासवर्गीय, स्त्री- पुरुष आणि गरीब-श्रीमंत अशा विविध भेदांची एक मोठी मालिकाच प्रेक्षक म्हणून आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. या सगळ्याचा या सिरीयल किलरकडून गैरफायदा घेतला जातो. महिला चौकशी अधिकारी अंजली भाटी  मात्र अत्यंत तरुण, तडफदार, हुशार आणि चाणाक्ष आहे. आपल्यावर होणारे विविध आरोप - प्रत्यारोप समाजाकडून, सहकारी पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून मागासवर्गीय म्हणून मिळणारी दुय्यम वागणूक, टिंगलटवाळी आणि सुशिक्षित मागासवर्गीय मुलगी म्हणून त्यातही पोलीस आहे म्हणून कोणताही मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होत नाही. यामुळे सतत मानसिक त्रास होत असूनही आपले काम ती अचूक बजावते.  प्रसंगी सवर्णांकडून होणाऱ्या त्रासाला खंबीरपणे तोंड देऊन गुन्हेगाराचा शोध घेते.  यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळणारी खंबीर साथ तसेच महिला पोलीस अधिकाऱ्याच्या हाताखाली काम करायला नको म्हणून नकळतपणे गुप्त माहिती फोडणारे सहकारी यांच्यावर मात करत ती गुन्हेगारांपर्यंत पोहोचते.

रीमा कागदी आणि झोया अख्तर यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने लिहिलेली कथा, पटकथा आणि तितकेच प्रभावी दिग्दर्शन यामुळे ही वेब सिरीज अत्यंत प्रेक्षणीय तर झाली आहेत परंतु भारतीय समाज म्हणून सध्या सुरू असलेल्या आणि माणूस म्हणून आपल्या चिंता वाढविणाऱ्या अनेक बाबी ठळकपणे समोर आणलेल्या आहेत मागासवर्गीय महिला पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील सोनाक्षी सिन्हा, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेतील गुलशन देवया आणि थंड डोक्याने अनेक मुलींचे खून करणारा सिरीयल किलर आनंद (विजय वर्मा) यांची कामे अत्यंत प्रभावी झालेली आहेत. हे तिघेही अत्यंत ताकदीचे कलाकार असून प्रत्येकाची आपली स्वतःची बॉलिवूडमध्ये एक ओळख आहे. तरीही हे तिघे दुर्दैवाने underrated  कलाकार आहेत. स्टारकीड असूनही अकिरा चित्रपट वगळता सोनाक्षीलाही आपल्या क्षमता दाखवून द्यायची संधी आजपर्यंत मिळाली नव्हती. या तिघांनाही या वेबसिरीजने ही संधी दिली आहे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर आणि उपयोग केला आहे. 

बाकी चित्रपटात या तीन पत्रांना  समांतर अनेक पात्रे असून ती एकमेकांशी या ना त्या कारणाने जोडली गेली आहेत. बाकी सर्व पात्रांचे स्वतःशी आणि इतरांशी तसेच आपापसात असलेले संघर्षही आपल्याला अनुभवास येतात. समूह जीवनातील अनेक चांगल्या वाईट घटनांचा सहजीवनावर होणारा (विशेषत: पोलिसांच्या) परिणाम तर दिग्दर्शकांनी इतक्या बेमालूमपणे मांडला आहे की जे सुरू आहे ते खरेच आणि आपल्या डोळ्यासमोरच  चालू आहे असे वाटत राहते.

 त्यामुळे रीमा कागदी आणि झोया अख्तर यांची "दहाड" ही वेबसीरिज एकदातरी नक्कीच पाहायला हवी. 

©के. राहुल, ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...