विक्रम वेताळ कथा: नव्या देशाची मागणी
या वेताळाला आपण कधी पकडून शकू की नाही, या विचारात असलेल्या राजा विक्रमाला अचानक लक्षात आले की, आज अमावस्या आहे. त्यातही 'सोमवती अमावस्या म्हणजे चांगलाच मुहूर्त!' हे लक्षात घेऊन आज काहीही करून वेताळाला पकडायचेच, असा पक्का निर्धार करून विक्रम राजाने घाईगडबडीने आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी वेताळाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची चूक यावेळी करायची नाही, असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. वेताळानेही विक्रम राजाला पाहिले आणि काहीही झाले तरी आज याला आपल्या पाठीवर बसू द्यायचे नाही, या विचारात असलेल्या विक्रम राजाच्या डोळ्याचं पातं लवण्याच्या आत वेताळाने चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले. वेताळ दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची तात्काळ हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण होशील. वेताळाच्या काव्याला बळी पडायचे नाही हे मनोमन ठरवून आलेला विक्रम नाइलाजानेच त्याला म्हणाला, "विचार तुझा प्रश्न?". त्यावर वेताळ म्हणाला, "महाराष्ट्र देशी कोण्या अभ्यंकराने आपल्या जातीचा वेगळा देश निर्माण करायचा विचार बोलून दाखवला आहे. खरंच तो म्हणतो तसा जातीचा वेगळा देश निर्माण करता येईल का?
"वेताळा, सगळ्यात अगोदर कोणीही उठसुट काही बोलले म्हणून ते गांभीर्याने घ्यायचे नसते आणि गांभीर्याने घ्यायचेच झाले तर बोलणारी व्यक्ती त्या तोलामोलाची आहे का, याचाही विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे तुला वाटते तितका हा प्रश्न महत्त्वाचा नसला तरी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे मला क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो. एखादा देश उभारायचा म्हणजे खायचे काम नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, आंदोलने करावी लागतात, उपोषणे करावी लागतात, प्रसंगी सश्रम कारावास भोगावा लागतो, अनेक हालअपेष्टा, कष्ट आणि अन्याय-अत्याचार सहन करावे लागतात. गरज भासल्यास सशस्त्र लढाही उभारावा लागतो. हा जो कोणी अभ्यंकर नावाचा माणूस आहे; त्याची आणि त्याच्या पूर्वजांची पाटी त्याबाबत पूर्णपणे कोरी आहे. असले संघर्ष यांना ठाऊक नाहीत. इतिहासात तश्या नोंदीही नाहीत. उलट भारत देशावर ज्या ज्या परकीय आक्रमकांनी सत्ता काबीज केली, त्या त्या आक्रमकांशी संधी करून त्यांच्या आश्रयाला राहणे आणि त्यांची मनसबदारी करण्यातच यांच्या पूर्वजांची हयात गेली आहे. ब्रिटिशांना तर त्यांनी हा देश आमचा नाहीच असे सांगून कर द्यायलाही नकार दिला होता. मुघलशाही, निजामशाही आणि इतर आक्रमकांची भलामन करून आपल्या पदरात दुय्यम का होईना पदे मिळतील आणि त्यातून द्रव्य प्राप्त कसे होईल हेच यांनी पाहिलेले आहे. भारत देशावर त्यांचे असलेले वर्चस्व हे देशातील बहुजन समाजाच्या अज्ञानामुळे आणि त्यांच्यामध्ये आपण यांच्यापेक्षा खालच्या जातीतील आहोत या असलेल्या न्यूनगंडामुळे टिकून आहे. त्याच्या जोरावरच ही अशी वक्तव्ये केली जातात. बहुजन समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता मिळवणे सोपे आहे परंतु त्यांच्या जीवावर दुसरा देश बनविणे वाटते तितके सोपे नाही. हा देश सोडायचा म्हणजे या देशावर प्रेम, निष्ठा नाही हेही आपोआप सिद्ध होईल आणि त्यातून त्यांना बहुजन समाजाच्या रोषालाही बळी पडावे लागेल सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रखर राष्ट्रवादाचा त्यांचा बुरखाही आपोआप गळून पडेल. शिवाय स्वतःच्या जातीच्या जीवावर नवा देश मिळविणे ही आजच्या काळातील सर्वात अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण अशी भेकड, संधीसाधू आणि दगाबाज माणसे स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत. चांगले राष्ट्र निर्मितीसाठी किती खस्ता खाव्या लागतात हेही त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे त्याच्या बोलण्याला त्याच्या जातभाईंनी सुद्धा गांभीर्याने घेतलेले नाही किंवा त्याला महत्त्व दिलेले नाही. तेव्हा तुला हा पडलेला प्रश्न आनाठायी आहे".
विक्रमाचे ते बोलणे ऐकून वेताळ छद्मी हसून म्हणाला व विक्रमा अगदी योग्य आणि मनासारखे उत्तर दिलेस, पण तू तुझे न बोलण्याचे वचन मोडलेले आहे. त्यामुळे तू मला पकडू शकत नाही, असे म्हणून वेताळ कर्कश्य हसत तिथून निघून गेला आणि विक्रम पुन्हा एकदा मोकळ्या हाताने आपल्या राजवाड्याकडे निघाला.
©के. राहुल, ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment