इंडिया आघाडीचे भवितव्य काय? मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकीची रविवार दिनांक 3 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या मतमोजणीत जे निकाल समोर आले त्यावरून हिंदी पट्ट्यातील विशेषत: गाय पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राज्यांनी भाजपला भाजपच्याही अपेक्षेपेक्षा जास्त संख्येने कौल देऊन गायपट्ट्यातील भाजपचे वर्चस्व सिद्ध केले आहे. असे असले तरी त्यामुळे काँग्रेस पुढील आव्हाने जास्त मोठी असल्याचे दिसून आले. 2024 मधील लोकसभा निवडणुकीचा सेमी फायनल म्हणून बघितल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिणेतील तेलंगणामध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमताने कौल देऊन दक्षिण भारतातून भाजपची आणि उत्तर भारतातून काँग्रेसची सत्ता संपुष्टात आणल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी त्यामुळे देशाची उत्तर व दक्षिण अशी विभागणी झाल्याचे प्रथमत: दिसून येते. ही नाही म्हटले तरी "भारतीय संघराज्य" अशी संरचना असलेल्या लोकशाहीच्या दृष्टीने तितकीच चिंतनीय बाब आहे. याचे भाजप आणि काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षांना काही सोयर सुतक असेल असे सध्या तरी वाटत नाही. पण या प्रश्नाकडे वेळीच गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे...