पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी शपथविधीनंतर सत्तेत विराजमान झाली असली तरी २०१४ आणि २०१९ सालच्या विजयाची झळाळी आणि तसा उत्साह भाजपच्या गोटात दिसला नाही. विजयाचा गुलाल उधळणे तर दूरच पण भाजपचे अनेक बडे नेते आणि कार्यकर्ते सुतकी चेहरा करून बसले होते. अधून मधून एखादा नेता किंवा कार्यकर्ता एनडीए इंडियापेक्षा कशी पुढे आहे आणि बहुमताचा आकडा भाजपच्या बाजूने नसला तरी एनडीएच्या बाजूने कसा आहे हे सांगत होता. पण त्यात मागील दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकल्यानंतर दिसलेला उत्साह कुठेही दिसत नव्हता. त्यातच मतमोजणी ही अत्यंत धीम्या गतीने सुरू होती आणि अनेक जागांवर अत्यंत चुरशीची लढाई सुरू असल्याने संध्याकाळचे चार वाजून गेले तरी चित्र अस्पष्ट होते. जसे जसे निकाल हाती येऊ लागले तसतसे अनेक राज्यातील भाजपचे महत्वाचे नेते, मंत्री आणि उमेदवार निवडणुकीत हरल्याचे समोर येऊ लागले. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांनी भाजपच्या गडांना हादरा देताना भाजपचे चारशे पारचे स्वप्न तर धुळीस मिळविलेच पण भाजपला बहुमतापासून अनेक योजने दूर ठेवले. मोदीं...