Skip to main content

वर्ण वर्चस्वाचे संघर्षमय चित्रण :काला कलीकरण

वर्ण वर्चस्वाचे संघर्षमय चित्रण : काला कलीकरण
 बदलत्या काळात विशेषतः जागतिकीकरणामुळे जगातील प्रत्येक देशातील जातीय, धार्मिक, आर्थिक आणि सामाजिक समिकरणे बदलतात असे म्हटले जाते. हे बदल 1991 नंतरच्या खाऊजा धोरणानंतर भारतातही झपाट्याने घडून आले.  पण त्या बदलांना अंगिकरताना जातीच्या, धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली आपण ज्या चुकीच्या प्रथा, परंपरा, जातीय आणि धार्मिक सत्ताकेंद्रे  सांभाळण्याचा आटापिटा केला त्यातून देशाचे आणि समाजाचे नुकसानच झाले.

रजनीकांतचा "काला" यावरच प्रकाश टाकतो.  त्यामुळे त्याच्या चांगल्यावाईट बाजूवर प्रकाश टाकणे आवश्यक ठरते.

रजनीकांतचा कोणताही चित्रपट म्हटले की तो सबकुछ रजनीकांत असतो.  तसाच हाही चित्रपट असणार असे गृहीत धरून चित्रपटगृहात  जाणाऱ्या प्रेक्षकांना रजनीकांत आणि नानाच्या जुगालबंदीची मेजवानीच अनुभवायला मिळते.  परिंदानंतर नानाने साकारलेला हा खलनायक अत्यंत खतरनाक आहे. थंड डोक्याने आपला कार्यभाग साधणारा, देशप्रेमाचे ढोंग करून स्वहित पाहणारा, जातीने वागणारा, अपमानाने पेटून उठणारा नाना जेव्हा जेव्हा दिसतो तेव्हा रजनीपेक्षा जरा जास्तच भाव खातो.  आपल्या नातीला काला हा रावण आहे असे सांगणारे आणि वाल्मिकीने लिहून ठेवलंय म्हणून त्याला मारावेच लागेल असे आपल्या नातीला सांगतानाचे नानाचे छद्मी हास्य त्याच्याविषयीची चीड वाढवते. त्यामूळे त्याचा खलनायक अत्यंत प्रभावी आणि यशस्वी झालाय.

त्याअगोदर चित्रपटाच्या सुरुवातीलाच कालाचे विश्व आपल्या समोर येते ते झोपडपट्टीतील कर्तव्यदक्ष दादा म्हणून. तो रंगाने काळा आहे आणि मागसवर्गातील आहे.  धारावी हि सर्व मागासवर्गीयांची वस्ती असल्याने राजकारण्यांनी आपल्या फायद्यांसाठी तिला जाणूनबुजून गलिच्छ केलेली वस्ती असून त्याला इथली व्यवस्थाच जबाबदार आहे हि त्याची ठाम धारणा आहे. त्याचे हे निरीक्षण खरे असल्याचे नंतर समोरची येते. राजकारण्यांचा ह्या जागेवर डोळा असून सोन्याच्या भावाची हि जमीन कवडीमोल किंमतीला बिल्डरांच्या घशात घालून आपले उखळ पांढरे करण्याचा हरी अभ्यंकर (आडनावावरून जात लक्षात येते) याचा प्रयत्न आहे. त्याच्या मदतीला पाटीलसारख्या (क्षत्रिय) पोलिसांची मोठी फौज आहे. मनू बिल्डर सारखा (वैश्य) बिल्डर मोठमोठी पण तितकीच खोटी स्वप्न दाखवून लोकांच्या मालकीची मोक्याची आणि हक्काची जागा हिरवून त्यांना 225 sq.ft. च्या खुराड्यात डांबण्याचा त्याचा संघटित प्रयत्न चालू आहे.
ज्यांच्या जागा जाणार आहेत ते घरकाम करणारे, रस्ते, गटारे, संडास, आणि नाले साफ करणारे, टॅक्सी, रिक्षा चालवणारे, भाज्या, दूध,पेपर विकणारे कामगार आणि मागासवर्गीय लोक आहेत. अर्थात हे सगळे शूद्र लोक आहेत. असा हा सगळा चातुर्वण्याचा खेळ जगतिकीकरण्याच्या गप्पा शांतपणे मारणाऱ्या आणि आता कुठे जात राहिलीय असे पावलोपावली सांगनाऱ्यांच्या काळात आपल्या नजरेसमोर येतो.

या सगळ्यात आणखी एक कोन आहे तो झोपडपट्टीतील नवीन पिढीचा, जिला ह्या गलिच्छपणाचा तिटकारा आहे, आपल्या वाडवडीलांनी हि जागा मिळवायला आणि टिकवायला किती कष्ट घेतले आणि किती संघर्ष केला याची त्यांना जाणीव नाही त्यामुळे त्यांना मनू बिल्डरने दाखविलेल्या उंच बिल्डींग, लिफ्ट, स्वतंत्र संडास, सिमेंटचे रस्ते, स्कुल, कॉलेज, मल्टिप्लेक्स, जिम, गोल्फचे मैदान यासारख्या नवश्रीमंतांना आकर्षित करणाऱ्या  छानछुकी बाबींची भुरळ पडली आहे. त्यातून जुन्या नव्यातला वाद  आणि संघर्ष कालाच्या घरातही पेटला आहे.

कामगार वर्गाला आत्मभान देणाऱ्या  लेनिनचे नाव असणारा कालाचा मुलगा ह्या स्वप्नाच्या मागे धावून हरीच्या छावणीत दाखल होतो पण वेळीच तो हरीचा कावा ओळखतो आणि आपला बिभीषण होणार नाही याची काळजी घेतो. पण सुडाने पेटलेला हरी कालाच्या जीवावर उठतो तेव्हा मात्र आपल्या बापाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. पण या संघर्षात आपल्या वडिलांच्या मागे खंबीरपणे उभा राहणार आणि वेळप्रसंगी त्यांची ढाल होणारा सेल्वा धारातीर्थी पडतो.

कालाला हा संघर्षाचा वारसा आपल्या वडील आणि गुरु वेन्गई यांच्याकडून मिळालेला आहे. ज्यांना दक्षिणेतील बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखले जाते त्या पेरियार यांचा फोटो ज्यांनी पहिला असेल त्यांना वेन्गईला पाहिले कि पेरियार यांची आठवण आल्याशिवाय राहनार नाही.  काला त्यांना हा संघर्ष ऐकवतो तेव्हा त्यांच्या मुलांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा लढा आणखी तीव्र होतो.

देशभक्ती आणि धर्म यांचे भांडवल करणारा हरिदादा मुंबई माझी आहे आणि माझीच राहणार असे सुनावतो तेव्हा बौद्ध स्तूपाच्या समोर उभे राहून त्याला हि जमीन आमची आहे आणि माझी परवानगी घेतल्याशिवाय तुला इथून पाऊलही टाकता येणार नाही हे सांगणारा रजनीकांत 'मी बुद्ध-पेरियार-आंबेडकर' यांच्या विचाराशी बांधिलकी सांगणारा आहे हे तोंडाने न सांगता प्रतीत करतो.

काला सर्वधर्म समभाव मानणारा आहे. त्याच्या मित्रांमध्ये आणि  नातेवाईकांमध्ये  मुस्लिम आहेत. मुस्लिमही आपलेच बांधव आहेत त्यांच्याशी सलोख्याने वागले पाहिजे असा सांगणारा आणि गोऱ्यापान झरीना या मुस्लिम मुलीवर प्रेमच नाही तर लग्नासाठी तयार झालेला नंतर काळ्या सेल्वि  बरोबर सुखाने संसार करणारा, तिला घाबरनारा काला त्याच्या दुसऱ्या रुपाचेही दर्शन घडवतो.

धारावी एकेकाळी काळा किल्ला म्हणूनच प्रसिद्ध होती. आज या किल्ल्याचे अवशेषही शिल्लक  नसले तरी अर्ध्या धारावीतील घरांच्या पत्यात आजही कालाकिल्ला अस्तित्वात आहे. दक्षिणेतील विशेषतः तामिळ दलित आणि मागासवर्गीय लोक कामाच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर त्यांनी या जागा धरल्या आणि आपल्या झोपड्या उभारल्या. त्या जागा ते सोडत नाहीत आणि आपल्याला जुमानत नाहीत हे लक्षात आल्यावर "बजाव पुंगी, हटाव लुंगी" सारख्या घोषणा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत जोर धरू लागल्या. त्याकाळातील राजकीय संघर्ष काला मधून आपल्यासमोर उभा राहतो. हा संघर्ष जितका रक्तरंजित दाखवला आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त भडक होता आणि एका अर्थाने तो दलित विरुद्ध सवर्ण असाही होता.

काला हा रंगाने काळा असला तरी त्याचा खरा रंग निळा आहे. काळ्या लोकांविषयी तिटकारा असलेला, स्वतः गोरा असलेला, कालाच्या घरचे पाणीही न पिणारा, वेळ आल्यावर धारावीत दंगल घडवून आणणारा, तेथील लोकांची वीज तोडून, पाणी बंद करून त्यांची नाकेबंदी करनारा हरिदादा शेवटी त्याच काळ्या निळ्या रंगात श्वास गुदमरून मारतो.  तेव्हा काला हा निळ्याचा पाईक असल्याचेही निदर्शनास येते.

हरिदादाने माजविलेली दंगल अंगावर शहारे आणणारी आणि मनात चीड निर्माण करणारी आहे. स्वतः आलिशान घरात रामानामाचा जप करत असताना दुसऱ्याची डोकी उडविण्याचा आदेश देताना हरीदादा  अजिबात विचलीत होत नाही. ज्याप्रमाने रामाने रावणाचा वध केला त्याचप्रमाणे आपणही काला वर विजय प्राप्त करू अशी त्याला खात्री आहे.

पण काला रावणाचेच नाव असून यावेळेस तो नीतिमान तर आहेच पण रामाला कोणतीही संधी देत नाही. त्याचमुळे तो देव धर्मात गुंतलेल्याना जास्त भावत नाही. कारण त्यासाठी प्रत्येकाला इतिहास माहित असावा लागतो.  तरच राम चूक कि रावण किंवा हरिदादा चूक कि काला चूक हे ठरविता येते.

काळाची आणखी जमेची बाजू म्हणजे चित्रपटात स्त्री पात्रे अत्यंत सशक्त असून ती आपल्या अधिकारासाठी आणि हक्कासाठी बंडाचा पवित्र घेताना दिसतात. लेनिन ची चळवळीतील सहकारी अत्यंत बंडखोर असून तिच्यापुढे झरीन आणि सेलवीं सुद्धा झोकळून जातात. हरिदादा बरोबरच्या संघर्षात स्त्रिया पुरुषांचा बरोबरीने त्या काला च्या बरोबर आहेत. काला च्या जीवावर बालंट येनार असे दिसताच त्या ढाल बनून उभ्या राहतात. मुंबईतील कष्टकरी वर्गाने आपल्या कामावर बहिष्कार टाकल्यावर त्या मुंबई तील धनदांडग्यांना धडा शिकविण्यासाठी त्यांची कामे करायची बंद करून आपले महत्त्व आणि गरज सत्ताधाऱ्यांना आणि धनिकांना दाखवून देतात.  असा हा काला लॉकाची गर्दी खेचत असताना एक आठवडा पूर्ण झाला की थेटर मधून काढला जात आहे हे तितकेच दुर्दैवी आहे. कदाचित प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात असल्याने असे निर्णय घेतले जात असतील.

चित्रपट म्हणून कालाकडे पाहताना त्याची कथा आणि पटकथा अत्यंत सशक्त असली तरी चित्रपटावर तामिळ आणि दाक्षिणात्य प्रभाव असल्याने तो तसा भडक वाटतो. तसेच संवाद प्रभावी पाहिजे होते इतके वाटत नाहीत. चित्रपटाने हिंदी चित्रपटात नेहमी पहायला मिळणारी गुळमुळीत भारतीय संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगल्याने निर्माता दिग्दर्शक यांचा हा प्रयोग खूपच धाडसी वाटतो. चित्रपटातील गाणी फार श्रवणीय नाहीत. ती नसली तरी फार फरक पडला नसता. Cinematography हि अत्यंत सुंदर असून झोपडपट्टीतील वातातवरण दाखवताना कुठेही कृत्रिमपणा जाणवत नाही. एकंदरच चित्रपट परिणामकारक असून  पाहण्यासारखा आहे. रजनीच्या या चित्रपटाने लिंगाचे अपयश पुसले जाईल हे माञ निश्चित. म्हणून चाकोरीच्या बाहेरचा चित्रपट म्हणून काला पाहायलाच हवा.
©के.राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...