स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरूंची वल्लभभाईंसह सर्व जाणकारांनी केलेली निवड पंडितजींनी अनेक अर्थांनी सार्थ ठरवली आहे. आज पं. नेहरूंची १२९वी जयंती. त्यानिमित्ताने... 'काय केलं त्या नेहरूंनी?, भारताचं वाटोळंच केलं, या देशाच्या ऱ्हासाला जबाबदार फक्त नेहरू आणि नेहरूच' किंवा 'जर आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी पटेल असते तर आज देश कुठल्या कुठे पोहोचला असता', असे बिनदिक्कत उद्गार काढणारा तरुणवर्ग आज जो दिसतो, त्याला या देशाचा इतिहास एकतर माहिती नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीत वाहवत जाऊन नेहरूंना नावे ठेवण्यासाठी तो पुढे येत असतो. सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याने तर आता नेहरू हे कायमचे खुजे ठरतील अशी व्यवस्थाच केली गेली आहे! इथे वल्लभभाई पटेल पंतप्रधानपदाला पात्र होते की नाही, हा सवालच नाही, पण तेच पात्र होते असे ठासून सांगत त्यांना पंडितजींवर अन्याय करायचा असतो. त्यावेळची ती निवड गांधीजींची आणि अर्थातच वल्लभभाईंसह सर्व काँग्रेसजनांची होती आणि त्यातल्या कुणालाच काही कळत नव्हते, असा दावा करण्याजोगी स्थिती नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान ज...