Skip to main content

कथा ते पटकथा : एक प्रवास

कथा ते पटकथा : अघटित या कथेचा प्रवास
प्रा.डॉ. राहूल सदाशिव खरात,
वाणिज्य विभाग, मु. सा. का. महाविद्यालय,
सॊमेश्वरनगर, पिनकोड-४१२३०६.
Email- srass229@gmail.com

प्रस्तावना:
कलेच्या क्षेत्रात वावरत असताना ज्या कलेकडे आपल्या सर्वांचे सर्वात जास्त लक्ष असते ती कला म्हणजे चित्रपट कला होय. यासाठी चित्रपट क्षेत्रातील झगमगाट जितका कारणीभूत असतो तितकाच कारणीभूत असतो तो त्या कलेचा सशक्तपणा!  या सशक्तपणामुळेच आपल्याला त्याबद्दल आकर्षण आणि आवड निर्माण होते. हा सशक्तपणा येण्याला जे काही घटक कारणीभूत असतात त्यामधील प्रधान घटक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे त्या चित्रपटाची कथा.  म्हणजे आपण एखाद्या दर्दी चित्रपट रसिकाला विचारले की, "तुला  हा का आवडला?" तर  तो सहज म्हणून जातो, "पिक्चरची स्टोरी खुप भन्नाट आहे राव!" म्हणजेच चित्रपटाचा पायाच कथा असते.  ही कथा चित्रपटाच्या अंगाने लिहीत असताना त्यावर जे काही संस्करण केले जाते त्याला पटकथा असे म्हणतात. हे संस्करण ही कथेइतकेच सशक्त असावे लागते.  तरच चित्रपट यशस्वी होतो. त्यामुळे कथा ते पटकथा असा एक मोठा प्रवास आपल्याला चित्रपट निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात दिसून येतो. म्हणूनच संशोधक स्वतः कथा आणि पटकथाकार असल्याने संबंधित शोधनिबंधात "अघटित" या स्वलिखित कथेचा पटकथेपर्यंतचा प्रवास रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

शोधनिबंध लेखनाचे उद्देश:
१. कथा आणि पटकथा लेखनाचा अभ्यास करणे.
२. कथा आणि पटकथा लेखनातील मूलभूत फरक समजावून घेणे.

शोधनिबंध लेखनाच्या मर्यादा:
संशोधकाने स्वतःच्याच कथा आणि पटकथा लेखनाचा अभ्यास केला असून एकच कथा आणि पटकथा अभ्यासासाठी निवडली आहे.

कथा:
कथाकार जेव्हा एखादी कथा लिहीत असतो तेव्हा त्याने कथेत रेखाटलेले प्रसंगचित्र हे बहुतांशी काल्पनिक असले तरी ही कल्पना त्याला आजूबाजूला घडलेल्या एखाद्या घटनेतून सुचलेली असते. मग ही घटना त्याने एकतर स्वतः पाहिलेली असते, वाचलेली असते किंवा कोणाच्यातरी तोंडून ऐकलेली असते. ज्याला कथा लिहिण्याचे अंग असते त्या व्यक्तीला ही घटना खरी आहे की खोटी आहे याच्याशी बऱ्याच वेळा काहीही सोयरसुतक नसते. त्याला त्या घटनेत कथाबीज दिसले की, तो त्या घटनेला कथेच्या रुपात कागदावर उतरवायचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याच्या वैचारिक ताकदीनुसार वेगवेगळा आणि दृष्टिकोनानुसार वेगळा असू शकतो. म्हणजे घटना एकच असली आणि एकाच घटनेवर अनेक लेखक कथा लिहीत असतील तर त्यांच्या दृष्टीकोनानुसार आणि वैचारिक क्षमतेनुसार तो त्या कथेला अपेक्षित आणि अनपेक्षित वळणे देऊ शकतो. त्यामुळे एकाच घटनेवर अनेक लेखकांनी लिहिलेली कथा वेगळी आणि तितकीच वाचनीय असू शकते.

लेखक ही कथा लिहीत असताना कथेतील प्रमुख पात्र म्हणून अगदी स्वतःला केंद्रस्थानी ठेवून किंवा तृतीय पुरुषी कथन स्वरूपात ही कथा मांडू शकतो. तसेच एकच घटना तो आपल्या कौशल्यानुसार कुटुंबिक, सामाजिक, सहस्य, भयकथा किंवा सुडकथा या स्वरूपात मांडू शकतो आणि ती तितकीच प्रभावी असू शकते.

पटकथा:
कथेचे पटकथेत रूपांतर करत असताना दृक-श्राव्य माध्यम समोर असते. मग ते नाटक किंवा मालिका किंवा माहितीपट किंवा लघुपट किंवा मग ते सिनेमा असेल. पटकथा लिहीन्याचे स्वरूप ढोबळ मानाने वरील सर्व प्रकारांसाठी सारखेच असले तरी नाटक किंवा मालिका किंवा माहितीपट किंवा लघुपट किंवा जर  सिनेमा  असेल तर पटकथा लेखकाला त्यानुसार पटकथेत बदल करावा लागतो. कारण त्यासाठी असलेला कालावधी, कलाकार, तंत्रज्ञान, प्रेक्षकवर्ग, चालू प्रवाह आणि एकूणच आर्थिक बाबी इ. विचार करावा लागतो.

पटकथा लिहीत असताना लेखकाला कथेतील प्रत्येक प्रसंग दृश्य स्वरुपात कसा असेल ते सविस्तर मांडावे लागते. म्हणजे कोठे घडला आहे, कथेतील कोणती पात्रे त्या प्रसंगात आहेत, प्रसंग दिवसा घडला आहे की रात्री घडला आहे, ज्या ठिकाणी प्रसंग घडला आहे त्या ठिकाणाची पार्श्वभूमी थोडक्यात नमूद करावी लागते. आणि त्या पत्रांमध्ये काही संवाद झाला असेल तर तोही नमूद करावा लागतो.  याचा जो एकत्रित परिणाम साधला जातो त्याला "दृश्य किंवा सीन" असे म्हटले जाते.  म्हणजे कथालेखकांना कथा लिहीत असताना ती स्वतःला समोर ठेवून किंवा कथन स्वरूपात लिहिली असली तरी पटकथा लिहीत असताना ते संवाद संबधित पात्रांच्या तोंडून बाहेर पडावे लागतात. तरच त्याला पटकथा म्हणता येईल आणि त्याचे दृश्य स्वरूप प्रभावी होईल.

अघटित या कथेचा पटकथेपर्यंतचा प्रवास:
अघटित ही कथा पुणे शहरात घडलेल्या एक सत्यघटनेवर आधारित असून घटना गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे ज्यात दोन महाविद्यालयीन युवतीमधील एकीचा अचानक खून होतो. त्या दोघी बाहेरगावच्या असून शिक्षणासाठी शहरात आलेल्या होत्या. त्यातील एक मुलगी समलिंगी आकर्षण असलेली  आहे जिने दुसऱ्यामुलीला  आपल्या जाळ्यात ओढले आहे आणि तिच्या सोबत समलिंगी  संबंधाच्या अश्लील चित्रफिती बनवून त्यातून ती पैसे मिळवत आहे.  ही बाब दुसऱ्या मुलीला समजल्यावर ती तिच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसांना हाताशी धरून खून घडवून आणते. बरेच दिवस पोलिसांना या घटनेचा छडा लागत नव्हता. आपली मुलगी हकनाक गेली याचे तिच्या आईला अतीव दुःख तर होतेच पण तिच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी लवकर शोधावे म्हणून ती आग्रही आहे.  पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर शेवटी तिच्या मैत्रिणीनेच हा गुन्हा केल्याचे सिद्ध होते. अशी ही साधी, सरळ आणि सत्य घटना आहे. संशोधकाने ही कथा लिहीत असताना मूळ कथा बीज म्हणजे तिच्या मैत्रिणीची पार्श्वभूमी, तिचे समलिंगी असणे आणि जिचा खून झाला ती निर्दोष असणे हे कथाबीज डोळ्यासमोर ठेवून या कथेला पटकथेत रूपांतरित करताना त्याला खुनी रहस्याची जोड दिली असून खुनी कोण आहे हे शेवट पर्यत लक्षात येणार नाही याची खबरदारी घेतली आहे. तसेच मूळ कथेत आणखी पत्रांचा समावेश केला आहे.  ज्यात तिचा मोठा भाऊ, तिचा प्रियकर, ज्याला ती खूप आवडते असा तिचा महाविद्यालयातील तिचा दुसरा मित्र,  महाविद्यालयाच्या प्राचार्यांची तिच्यावर असणारी वाईट नजर, त्यातून तिची सुटका करणारे तिचे सर, ती आणि सर यांच्यात निर्माण होणारे हळवे नाते, तिच्या समलिंगी मैत्रिणीला असलेला मुलांचा तिटकारा आणि तिच्या प्रियकरापासून तिला दूर ठेवण्याचे तिचे प्रयत्न, मित्राचा तिच्याकडून झालेला भ्रमनिरास, तिच्या भावाला लागलेली तिच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण आणि त्यातून दोघांची झालेली भांडणे, तिच्या खुनानंतर तिच्या प्रियकराचे अचानक गायब होणे, भावाच्या वागण्यात आलेला बेफिकीरपणा, तिच्या आईने चौकशीसाठी प्रयत्न करू नयेत म्हणून तिच्या नकळत तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे.  आईचे मुलीचा खुनी सापडावा म्हणून मुख्यमंत्र्यापर्यंत जाणे, त्यांनी पोलिसांना जमत नाही म्हणून चौकशीचे प्रकरण सी. आय.डी. कडे सोपविणे आणि  सी. आय.डी. अधिकाऱ्याने मोठी जोखीम पत्करून खुनी शोधणे आणि तो प्रेक्षकांच्या कल्पनेबाहेरचा तीसराच कोणीतरी असणे हे रहस्य संशोधकाने शेवटच्या मिनीटापर्यंत कायम ठेवले आहे. कथेत ही हे रहस्य कायम ठेवण्यात संशोधकाला यश मिळाले आहे. त्यामुळे पटकथाही तितकीच सशक्त झाली आहे.

पटकथा:
अघटित या कथेचे पटकथेत रूपांतर करत असताना मूलतः चित्रपट हे दृक श्राव्य माध्यम समोर ठेवले असल्याने आणि मराठी आणि हिंदी अश्या दोन्ही भाषेत कथा आणि पटकथा लिहिली असल्याने पटकथा लेखनात हिंदी चित्रपट लेखनाचा प्रभाव जाणवतो.

चित्रपटाची पटकथा डोळ्यासमोर ठेवल्याने आणि गुन्हेगारी व खुनी रहस्याचा उलगडा होणार असल्याने लेखकाने सुरुवातील कथेच्या नायिकेचा पुनमचा खून झालेला दाखविला असून पोलीस तपास करायला अपयशी ठरल्याने प्रकरण युगांत अमन या सी. आय.डी. अधिकाऱ्याकडे सोपविले जाते. पुनमशी संबधित सर्वांची चौकशी करत असताना पूर्वावलोकन (फ्लॅशबॅक) तंत्राने हळूहळू खुनाचे रहस्य उलगडत जाते. यात सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे या खुनाच्या संशयाची सुई चौकशीच्या एक टप्प्यावर तिच्या आईकडेही वळते आणि वाचक आणि प्रेक्षकांना त्याचा मोठा धक्का बसू बसतो.  खुनाचे रहस्य शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहत असल्याने वाचक आणि प्रेक्षक त्यात गुंतून राहतात.

निष्कर्ष:
चांगली पटकथा निर्माण होण्यासाठी सशक्त कथा आणि चांगला लेखक या दोहोंची आवश्यकता असते. एकवेळ कथा कमजोर किंवा  सामान्य असली तरी पटकथा लेखक जाणकार आणि अनुभवी असेल तर तो सुमार कथेतुनही असामान्य पटकथा लिहू शकतो. हे आपण उंबरठा या चित्रपटाच्या पटकथेतुन अनुभवले आहेच. पण अशी उदाहरणे फारच तुरळक असून चांगल्या पटकथेसाठी कथा आणि कथाबीज दोन्ही सशक्त असणे आवश्यक आहे तरच चांगली पटकथा निर्माण होऊ शकते.

संदर्भ  साहित्य:
१. सैद फिल्ड, (१९७९), दि स्क्रीन रायटर्स वर्कबुक, यू.एस.ए.
२. ख्रिस्तोफर वोग्लार, (१९९२), दि रायटर्स जर्नी, मिथकल स्ट्रक्चर फॉर रायटर्स, मायकल विझ प्रकाशन.
३. जॉन थर्बी, (२००७), अनटॉमी ऑफ स्टोरी.



Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...