Skip to main content

त्रियाचरित्र

त्रियाचरित्र
         "त्रियाचरित्र" ही प्रेमचंद यांची अत्यंत वास्तवदर्शी आणि भारतीय समाजमानचे चित्रण करणारी साहित्यकृती आहे. या कथेवर आधारित "त्रियाचरित्र" याच नावाचा चित्रपटही ८० च्या दशकात आलेला होता आणि तो समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी तितकाच उचलून धरला होता. कोरोनाच्या कृपेने अपघाताने का होईना ही साहित्यकृती वाचण्याच्या आणि चित्रपट पाहण्याचा योग आज जुळून आला.  भारतातील अनेक भाषांमध्ये प्रांतिक गरज लक्षात घेऊन विषय आणि आशय तोच ठेवून "त्रियाचारित्र" हा चित्रपट आला आणि गाजला सुद्धा. त्याला कारण म्हणजे भाषा वेगळी असली तरी स्त्री शोषण आणि त्याचे स्वरूप सर्वत्र सारखे असणे होय. त्यातही आणखी एक साम्य म्हणजे शोषित स्त्री खालच्या वर्गातील असणे होय. पण तरीही प्रेमचंद यांचे वेगळेपण म्हणजे खालच्या जातीची माणसे सवर्णांना हाताशी धरून आपल्याच स्त्रियांचे शोषण कसे करतात हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.  एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर जबरदस्ती करणे किंवा तिला बदनाम करणे ही सामान्यपणे विकृती समजली जाते कारण तो पुरुषही त्यात बदनाम होतो पण आपले सामाजिक स्थान लक्षात घेऊन त्याला कोणताही धक्का लागू न देता एखाद्या स्त्रीला बदनाम करणे, तिचे शोषण करणे आणि त्याचवेळेला गरज पडल्यास सगळा समाज अगदी स्त्रीवर्गासह आपल्या बाजूने उभा करणे हे धूर्त आणि भोंदू पुरुषाचे लक्षण असते. प्रेमचंद यांनी असा धूर्त, भोंदू आणि लब्धप्रथिष्टीत पुरुष ताकदीने उभा केला आहे. नसरुद्दीन शाह या गुणी अभिनेत्याने हा समाजात सभ्यपणाचा मुखवटा घेऊन वावरणारा, गावातील इतरांचे प्रश्न सोडविणारा, गाव पुढाऱ्यात उठबस असणारा आणि गावातील जातपंचायतीचा सदस्य असणारा विसाराम अत्यंत बेमालूमपणे साकारला आहे. मूळकथेचे  पटकथेत रूपांतर करताना पटकथाकाराने आणि दिग्दर्शकाने मूळ कथेला कोठेही धक्का लावलेला नाही त्यामुळे त्रियाचारित्र मधील स्रीशोषण आणि त्याविरुद्ध तिने दिलेला लढा सशक्तपणे समोर येतो. 
        "त्रियाचारित्र" ही विमली नावाच्या एका मुलीच्या संघर्षांची कथा आहे. बालपणीच विवाह झालेली विमली वयाची १५ वर्षे झाली तरी अजून सासरी गेलेली नाही. तिचे सासरही तिच्या गावापासून दोन कोसावर आहे. तिचा नवरा असलेला सीताराम कोलकात्याला पैसे कमविण्यासाठी गेलेला आहे. सासू हयात नाही त्यामुळे सासरा एकटाच घरी राहतो आहे. खूप लहानपणी तिचा विवाह झाल्यामुळे गेल्या दहा वर्षात तिने नवऱ्याचे तोंड पाहिलेले नाही पण त्याची काल्पनिक प्रतिमा मात्र तिच्या मनात आहे आणि तिने गावातील जत्रेत त्याचे नावही आपल्या हातावर गोंदवून घेतले आहे. परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला खूप लहानपणापासून वीटभट्टीवर कामावर जावे लागते. अनेक प्रकारची लोकं आणि त्यांची वागणूक पाहून तिला चांगली वाईट माणसे, त्यांच्या बोलण्याचे हेतू, त्यांची नजर याची चांगली पारख आहे. पण काम करायचे तर सगळयांशी मिळून मिसळून रहावे लागेल याचीही तिला जाणीव आहे. आपण विवाहित आहोत आपल्या चारित्र्यावर डाग लागणार नाही याची ती काळजी घेते. त्यामूळे माल न्यायला येणार ट्रक ड्रायवर आवडत असूनही आणि तो तसा प्रयत्न करत असूनही ती कधीही आपले पाऊल वाकडे पडू देत नाही. त्याचबरोबर गावातील ट्रॅक्टर चालक बिल्लरही तिचे लग्न झालेले माहीत असूनही तिला लग्न करण्याची आणि पाहिले लग्न मोडले म्हणून जातपंचायतीकडून होणारा दंड स्वतः भरण्याची तयारी दाखवितो पण ती त्याला बळी पडत नाही. म्हणून चिडून बिल्लर तिची गावभर बदनामी तर करतोच पण  तिच्या सासऱ्यालाही ती वाईट चालीची असून तिचे त्याच्याबरोबरच आणखी एका ट्रक ड्रायव्हरबरोबर अनैतिक संबंध असल्याचे सांगतो. तेव्हा विसाराम तिला सासरी घेऊन जायला येतो. तिचे आईवडीलही या बदनामीने हादरुन जातात आणि मुलीची सासरी रवानगी करतात. पण त्यावेळेसही  तिचा नवरा तिला न्यायला येत नाही हा गावभर चर्चेचा विषय होतो.
          मोठया थाटामठात विमली सासरी येते. विमली नव्हती तेव्हा रोज घराबाहेर बाज टाकून झोपणारा तिचा सासरा विमली आल्यापासून घरात झोपायला लागतो. रोज सकाळी मंदिरात जाणारा, भजन कीर्तन करणारा, ज्येष्ठ लोकांपुढे नतमस्तक होणारा तिचा सासरा रोज रात्री मांस, मटण, मासे खाणारा, दारू पिणारा, चिलम ओढणारा, जुगार खेळणारा आहे. हे त्याचे गावापासून लपून राहिलेले दुसरे रूप विमलीच्या नजरेतून लपून राहत नाही. विमलीला यामुळे असुरक्षित वाटायला लागते. आपला नवरा कोलकत्याला कोठे आणि काय काम करतो, कुठे राहतो याबद्दल तिला काहीच माहीत नाही. आपला नवरा आणि सासरा याचे संबंध फार चांगले नाहीत म्हणून तो घर सोडून निघून गेल्याचे तिला गावातील महिलांकडून समजते. ती गावातील काही लोकांकडून त्याचा पत्ता मिळविते आणि गुपचूप त्याला पत्र पाठवून बोलवूनही घेते. इकडे रोज बाहेर झोपणारा विसाराम सून आल्यापासून अचानक घरात झोपायला लागला म्हणून गावातील बायका येता जाता चर्चा करायला लागतात. अधूनमधून तिची ख्याली खुशाली विचारण्याच्या नावाखाली तिच्या घरात डोकवायला लागतात. बरीच वर्षे शरीर सुखाला पारखा झालेला विसाराम तर्र होऊन तिच्यावर वाईट नजर टाकायला लागतो. एके दिवशी विमली झोपेत असताना तो तिच्यावर जबरदस्ती करू पाहतो. वीट भट्टीवर काम करून अत्यंत काटक आणि धाडसी झालेली विमली त्याला जबर मार देते. इतका की तिच्याकडे पहायची पण त्याला भीती वाटायला लागते.
        विमलीने आपल्याला मारल्यामुळे चवताळलेला विसाराम तिच्यावर कसा सूड उगवता येईल याचा विचार करायला लागतो. दोन तीन दिवसानंतर तो आपली बाज पुन्हा अंगणात टाकतो. शेतातून गव्हाचे, भाताचे काड आणून तिच्यासाठी दुसरी झोपडी घालतो. विमलीला अचानक त्याच्या वागण्यात झालेल्या बदलामुळे धक्का बसतो. पण हा पुन्हा काहीही करू शकतो म्हणून ती सावध असतो. एके दिवशी संध्याकाळी तो मंदिरातून घरी येतो आणि तिच्या पायावर लोटांगण घेतो. 'तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस, अब्रू आहेस आणि मी तुझ्यावर अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. पण माझी त्यात काहीही चूक नाही. मंदिराच्या पुजाऱ्याने माझ्या प्रसादात काही तरी मिसळले आणि माझी मती भ्रष्ट झाली. मला माफ कर', असे म्हणतो. विमली त्याला माफ करते पण तरीही तिने त्याला पुरते ओळ्खलेले असते. त्यामुळे झोपताना ती दरवाज्याला नीट कडी लावून आणि पाटा लावून झोपत असते.
      इकडे विसाराम आपल्या झोपडीत तडफडत असतो. "सगळ्या गावाबरोबर मजा मारणारी, अनोळखी लोकांबरोबर, बनारस, धनाबाद फिरणारी, ड्रायव्हर कडून पैसे दागिने स्वीकारणारी फुटकळ बाई माझ्या मुलाची बायको म्हणजे माझाही तिच्यावर तितकाच अधिकार आहे", असा विचार करत मनातून तो धुसफूसत असतो. पण झोपडीच्या बाहेर आला की अगदी देवासारखा वागत असतो. बराच काळ गेल्यावर विमलीलाही आपण चुकीचे वागतोय असे वाटायला लागते. सून असताना सासरा बाहेर जेवतो यावरून बायकांची कुजबुज व्हायला लागते. विमलीलाही वाटते की आपला सासरा असा बाहेर जेवतो हे बरे नाही. सासरा जेवणासाठी तिच्याकडे यायला लागतो. गावातील मंदिरात देवाचा उत्सव चालू होतो. सासरा नित्यनियमाने पुजाऱ्याच्या बरोबरीने मंदिरात जात असतो आणि येताना देवाचा प्रसाद घेऊन येत असतो. विमलिही तो खात असते.
        विमलीने आपल्याला पूर्ण माफ केले आहे आणि ती आता गाफील आहे हे लक्षात आल्यावर संधी साधून विसाराम तिच्यासाठी प्रसाद घेऊन येतो आणि येताना त्यात अफू मिक्स करतो. प्रसाद देऊन तो 'आज मी जेवायला येणार नाही, माझे जेवण बनवू नको', असे सांगून मंदिरात निघून जातो. विमली तो प्रसाद खाते आणि चक्कर येऊन घरातील बाजेवर पडते. शेजारी कुत्रे बसलेले असते तेही तो सांडलेले प्रसाद खाते आणि भुलून पडते. मंदिरात बसलेला विसाराम पुजारी झोपायला गेला आहे याची खात्री करून लगबगीने घरी येऊन विमलीच्या झोपडीत शिरतो. चिलीम शिलगावतो, दारूची बाटली बाहेर काढतो आणि खिशातून आणलेले मच्छी मसाला पार्सल काढतो आणि खाऊन पिऊन तर्र झाल्यावर विमलीवर जबरी बलात्कार करतो. अफूच्या अमलाखाली असलेल्या विमलीला हे सगळे कळत असते पण तिची हालचाल पूर्ण मंदावलेली असते. आपले इप्सित साध्य झाल्यावर विसाराम घरात कुदळीने एक खड्डा खोदून ठेवतो आणि कोणी आपल्याला पाहत नाही हे पाहून पुन्हा मंदिरात जाऊन झोपतो.
       इकडे मध्यरात्र उलटल्यावर विमली सावध होते. इतके दिवस जपलेली अब्रू सासऱ्याने  लुटली हे पाहून तिचा संताप अनावर होतो. ती त्याच अवस्थेत हातात रॉकेलचा डबा आणि काडेपेटी घेऊन त्याला झोपेतच जाळण्याच्या विचाराने त्याच्या झोपडीत येते. पण विसाराम तिथे नसतो. आता उद्या आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याचा तिला अंदाज येतो. गावपंचायतीपुढे पश्न मांडून आपल्याला न्याय मिळणार नाही त्यापेक्षा इथून गुपचूप निघून आपल्या नवऱ्याकडे जाणे हा एकच पर्याय तिला दिसतो आणि पहाटे गुपचूप ती आपला पसारा घेऊन रेल्वे स्टेशनला जायला निघते.
       मंदिरात बसून विसाराम विमली आता काय पाऊल उचलणार याची वाट बघत असतो पण बराच वेळ गेला तरी काहीच हालचाल दिसत नाही म्हणून तो दबकत दबकत घरी येतो पण त्याला घरात कोणीच दिसत नाही. तो लगेच आरडाओरडा करून गाव गोळा करतो. माझी सून वाईट चालीची आहे. तिचे बनारसच्या ट्रक ड्रायव्हरबरोबर अनैतिक संबंध असून ती त्याच्याबरोबर पळून गेली. जाताना  माझ्या बायकोचे मी झोपडीत पुरून ठेवलेले दागिनेही घेऊन गेली असे म्हणत पंचांना घरातील खड्डा दाखवितो.
          पंचायतीसमोर सगळा गाव गोळा होतो. पंचायत बसते. गावातील एका रिकामटेकड्या टोळक्याला विमलीला शोधून आणायला सांगितले जाते. ते सगळीकडे तिला शोधायला लागतात. विमली रांचीहून कोलकात्याला जाणाऱ्या रेल्वेत बसलेली असते. हे टोळके जबरदस्तीने तिला उचलून न्यायला लागते. शेजारी बसलेला एक युवक विरोध करतो पण त्यालाही मारहाण केली जाते. विमलीला उचलून जात पंचायतीत आणले जाते. सगळया बायका कुजबूज करायला लागतात. विमलीला निर्लज्ज, कुलटा, बदफैली म्हणायला लागतात. विमली रागाने त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकते आणि सगळया महिला गप्प होतात. पंचायत सुनावणी चालू करते. विमली सासऱ्याचे सर्व आरोप फेटाळते आणि त्याने तिच्यावर अफू चारून बलात्कार केल्याचे सांगते. पण गावाचा पुजारी त्यात रात्री विसाराम रात्रभर मंदिरातच झोपल्याची साक्ष देतो. तिला रेल्वेतुन आणताना तिच्या शेजारी जो युवक असतो तोच तिचा प्रेमी असल्याचे गावगुंडांच्या साक्षीवर पंचायत मान्य करते. विसाराम धार्मिक माणूस आहे. मांस मच्छी खात नाही. तूच त्या ट्रक ड्रायव्हरला रात्री घरी बोलवून मजा मारली असे पंचायत ठरविते. विमली ठामपणे हे सगळे नाकारते.  पण तिच्या बाजूने साक्ष द्यायला कोणीच नसते. विमली आशेने गावातील लोकांकडे पाहायला लागते तेव्हा गावातील मासे विकणारी एक बाई उभा राहते आणि काल रात्री विसाराम माझ्याकडून मासे घेऊन गेला आणि नेहमीच तो घेऊन जातो. त्याच्या घरी बाई माणूस नसल्याने मीच त्याला नेहमी गुपचूप मच्छी मसाला बनवून देते असे सांगते तेव्हा विसाराम "ही मच्छीवाली बाल विधवा आहे. गावातील अनेक पुरुषाबरोबर तिचे अनैतिक संबंध आहेत', असे सांगून अनेक पुरुष तिच्या विरोधात उभा करतो. आपल्या सुनेला मासेवालीचीच फूस आहे, असे म्हणून तिलाही बदफैली ठरविले जाते आणि पंचायतीतुन बाहेर काढले जाते. विमली हतबल होते. मी चोरी केली नाही, माझे कोणाशीही अनैतिक संबंध नाहीत, मी पळून चालले नव्हते मी माझ्या नवऱ्याकडे कोलकात्याला चालले होते, माझा सासरा वाईट प्रवृत्तीचा आहे, त्याने अगोदरही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता.  हे ती ओरडून ओरडून सांगते पण पंचायत तिला गुन्हेगार आणि बदफैली ठरविते. वेदांमध्ये अश्या स्त्रीला काय शिक्षा दिली आहे हे गावच्या पुजाऱ्याला विचारले जाते तेव्हा पुजारी म्हणतो, "अश्या स्त्रीने सहा महिने पुजाऱ्याची सेवा केली पाहिजे". विसारामला सून स्वतःजवळच हवी असते आणि तो जातपंचायतीचा सदस्य असतो. पंचांना हाताशी धरून तो हा पर्याय टाळतो आणि दुसरी शिक्षा सुचवायला सांगतो. पंच म्हणतात, "विमली ही विसारामच्या घराची इज्जत आहे तसेच ती गावचीही इज्जत आहे. शिवाय ही तिची पहिलीच चूक आहे पण विसारामसारख्या देव माणसावर खोटा आरोप केला म्हणून तिला शिक्षा तर झाली पाहिजेच. त्यामुळे तिला संपूर्ण गावासमोर अश्या ठिकाणी डागण्याची शिक्षा दिली जाते की ती कोणालाही ती जागा दाखवू शकणार नाही आणि डागण्याचा अधिकार विसारामला दिला जातो. विसाराम आतून हादरतो कारण ज्या जागेसाठी हा सगळा अट्टाहास केला ती जागाच विद्रूप होणे त्याला नको असते. पण पंचायत आपला निर्णय मागे घेत नाही. शिक्षा ऐकून विमली पेटून उठते तिचा अवतार बघून सगळे स्तब्ध होतात. कोनात हिम्मत असेल तर पुढे या! असे आव्हान करून ती जायला निघते. विमलीला आडवायची कोणाचीच हिम्मत नाही, हे पाहून पंचायत प्रमुख चिढतो. विमलीला उचलून आणायचे फर्मान तो काढतो. लोहारकडून सळी तापवून आणली जाते. गावातील चार पाच दांडगे पुरुष तिला जखडून ठेवतात. विसारामच्या हातात सळी दिली जाते. विसाराम अनिच्छेनेच तिला त्या ठिकाणी डागतो. सगळ्या गावासमोर  विमलीला शिक्षा सुनावली जाते. मुलीला शिक्षा सुनावली आहे हे ऐकून ज्या हात तुटलेल्या वडिलांचे ऑपरेशन व्हावे म्हणून वयाच्या ९व्या वर्षी वीटभट्टीवर मोलमजुरीला जायला लागते, ज्या बापाला तिने आयुष्यभर मुलगा होऊन सांभाळले तो बापही मुलीला बदफैली ठरवून मोकळा होतो आणि बैठकीतून निघून जातो. बापाच्या अश्या जाण्याने विमली आतून पूर्ण कोलमडते.
   विमलीची ही कथा झारखंडमधील रांची जवळ असलेल्या एका दलित गावातील कथा आहे. शुद्रतिशूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या कुर्मी जातीतील विमली लहानपणापासूनच अत्यंत धाडसी आणि बंडखोर मुलगी आहे. खालच्या जातीत जन्माला आल्यामुळे गावातील सवर्णांच्या मेहेरबानीवर जगणे आलेच. त्यातच पैशाच्या गरजेमुळे त्यांच्या जमिनीचा छोटासा तुकडा जमीनदाराकडे गहाण पडला आहे. विमलीला तिच्यापेक्षा वयाने दहा वर्षे मोठा असलेला भाऊ आहे. त्याच्या लग्नात भरपूर हुंडा आणि सोने नाणे घेऊन त्यातून आपली जमीन सोडवायची असे तिच्या आईचे गणित आहे. त्यामुळे विमली सात वर्षांची असतानाच भावाचे लग्न करून दिले जाते. त्याच्या लग्नातील हुंडा आणि सोने नाणे सासूने काढून घेऊन कोठेतरी दिले यावरून त्याची बायको भांडण करते ती कोणालाच जुमानत नाही. त्यामुळे तिच्या आईला सगळे पैसे आणि सोने तिला परत तर दयावे लागतेच पण आपल्या नवऱ्याला घेऊन ती कायमची माहेरी निघून जाते. त्या धक्क्याने आई आजारी पडते आणि वडिलांचा अपघात होऊन दोन्ही हात मोडतात. त्यावेळेस विमली नऊ वर्षांची असते. आई आजारी, वडिलांच्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागणार असते. पण त्यासाठी पैसे नसतात. मग ज्या जमीनदारकडे जमीन गहाण असते त्याच्याकडे विमलीला सालाने ठेवले जाते. कामाच्या बदल्यात तिला दोनवेळचे जेवण दिले जाईल असे ठरते पण विमलीला तो जाच सहन होत नाही १० वर्षांची विमली तिथून पळून येते आणि शेजारच्या गावात चालू झालेल्या वीटभट्टीवर कामाला जायचे ठरविते. वीटभट्टीवर मुली काम करत नाहीत, तिथली मुले गुन्हेगारी प्रवृत्तिची आणि व्यसनी असतात तू तिथे जाऊ नको असे आई वडील सांगतात पण विमली या वयात त्याचे म्हणणे धुडकावते आणि थेट वीटभट्टी मालकाला जाऊन भेटते. मालक चांगला माणूस असतो तो तिला कामावर ठेवून घेतो आणि इतरांच्या बरोबरीने पगारही देतो. विमली हळूहळू जमीनदारांचे सगळे पैसे परत करते, जमीन सोडवून घेते, उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात टिकेल अशी झोपडी उभा करते, हळूहळू संसाराला लागणाऱ्या सगळ्या वस्तू ती घरात आणते, जिल्ह्याला जाऊन वडिलांचे ऑपरेशनला करून आणते. त्यांचे हात नीट होतात पण त्यांना कष्टाचे काम करता येत नाही. त्यामुळे ते गावातील हलकेफुलकी कामे करायला लागतात. सगळया गावभर विमलीचे कौतुक व्हायला लागते. विमली आपला दुसरा मुलगाच आहे असे आई वडील अभिमानाने सांगायला लागतात. विमलीमुळे गावातील अनेक मुली आणि महिला बिनघोरपणे वीटभट्टीवर कामाला यायला लागतात. सगळ्या गावभर विमली प्रसिद्ध व्हायला लागते.
            एव्हाना विमली वयातही आलेली असते. ती कष्टाळू तर असतेच पण अत्यंत सूंदर स्वयंपाकही बनवत असते. त्यामुळे विटभट्टीचा मालक खानचाचा तिला तिथेच विटा न्यायला येणाऱ्या लोकांसाठी जेवण बनवायची जबाबदारी देतात. त्यातीलच एका ट्रक ड्राइवरला विमली आवडायला लागते. तो निमित्त काढून विमलीला सारखा भेटायला यायला लागतो. येताना तिला भेटवस्तूही आणायला लागतो. पण विमलीच्या मनात मात्र त्याच्याबद्दल मैत्रीशिवाय दुसरी कोणतीच भावना नसते.
           संपूर्ण कथा आणि चित्रपट विमली आणि विसाराम या पात्रांभोवती फिरतो. राजेश्वरी मराठे या मराठमोळ्या अभिनेत्रीने (ही आयत्या घरात घरोबा या मराठी चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर दिसली होती) विमलीची भूमिका साकारताना जीव ओतला आहे. अल्लड, अवखळ विमली ते सशक्त आणि धाडसी स्त्री हा तिचा प्रवास पाहण्यासारखा आहे. यूट्यूबवर हा चित्रपट आणि ही कथाही वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध आहे. एकदा जरूर पहा आणि वाचा.
©के. राहुल
९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...