सेमिफायनालचा अन्वयार्थ: ११ डिसेंबर रोजी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यामधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने तीन चतुर्थांश जागासह छत्तीसगढ जिंकताना अपेक्षित राजस्थानसह मध्यप्रदेशचा गड ही अटीतटीच्या लढतीत सर केला पण मिझोराम या पूर्वेकडील एकमेव राज्यातील सत्ता गमविली आणि येथे काँग्रेससह भाजपचा दारुण पराभव झाला. तीच गत या दोन्ही पक्षांची तेलंगणामध्ये झाली. तेलंगणाव्यतिरिक्त इतर चारही राज्यात जनतेने प्रस्थापितांविरुद्ध कौल दिला असला तरी या निकालाचा इतकाच मर्यादित अर्थ काढणे चुकीचे ठरेल. राजस्थान, मध्यप्रदेश आणि गेल्या दशकात मध्यप्रदेशातूनच निर्माण झालेला छत्तीसगढ, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि उत्तरांचल ही राज्ये प्रामुख्याने "काऊ बेल्ट" समजली जातात. म्हणजेच खऱ्या अर्थाने ही राज्ये हिंदी आणि हिंदूंच्या प्रभावाखालील राज्ये समजली जातात कारण या राज्यांमध्ये हिंदूंची संख्या ९०% च्या आसपास आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार हे हिंदूंचे गड असले तरी या दोन राज्यात मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे तर झारखंड आणि छत्तीसगढ ही आदिवासीबहुल ...