सुपर ३० आणि समाजव्यवस्था: भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि त्यातही बॉलीवूडचे एक वैशिष्ट्ये राहिलेले आहे. ते म्हणजे बॉलीवूडने नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजमनाचा आरसा दाखविला आहे. तरीही काही अपवाद वगळता बॉलीवूडने तयार केलेल्या चित्रपटांवर नेहमीच टीका होत राहिली आणि त्यात तथ्यही आहे. बॉलीवूडने वेगवेगळ्या विषयाला हात घालून ते गंभीरपणे मांडले असले तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिलेले आहे कारण त्यामागे असलेली आर्थिक गणिते, बाजारपेठेची मागणी आणि वर्चस्वाचे राजकारण. परंतु इकडून तिकडून विषय उचलून त्याचा विचका करण्यात आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक धन्यता मानत असतानाही काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत आर्थिक गणिते आणि वर्चस्वाचे राजकारण याची तमा न बाळगता वेगळे आणि ज्वलंत विषय समर्थपणे हाताळत आहेत. विशेष म्हणजे आशय-विषय चांगला असलेल्या या चित्रपटांना वास्तवातील घटनांची जोड दिल्याने व्यावसायिक यशही मिळाले आहे. गेल्या महिन्यात आलेला "आर्टिकल १५" आणि नुकताच प्रदर्शित झालेला "सुपर ३०" हे दोन्ही चित्रपट ज्वलंत सामाजिक प्रश्न मांडणारे असूनही व्यावसाय...