*नेहरूंमुळेच काश्मीर भारतात* भारताच्या या पहिल्या पंतप्रधानांच्या नावाचा नुसता गजर २०१४ सालच्या निवडणुकांपासून चालू आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून ज्या काही समस्या निर्माण झाल्या, त्यास पंडित जवाहरलाल नेहरू हेच जबाबदार आहेत, असा धोशा २०१४ च्या निवडणूक प्रचारापासून लावण्यात आला आहे. मग ते अर्थकारण असो, राजकारण असो वा देशातील इतर कोणतेही क्षेत्र असो. थोडक्यात, नेहरूंमुळे देशाची आज ही ‘स्थिती’ झाली आहे आणि ती सुधारायची असल्यास ‘काँग्रेसमुक्त भारत’ हवा, अशी ही भूमिका आहे. ... आणि देशापुढची आजची सर्वात मोठी समस्या ही दहशतवादाची आहे. हा दहशतवाद पाकपुरस्कृत आहे. पाक हे डावपेच खेळत आहे, ते काश्मीर त्याला न मिळाल्यामुळे आणि *हा घोळ घातला गेला, तो नेहरूंच्या धोरणात्मक चुकांमुळे, अशी टीकेची झोड उठविली जात आली आहे. ही भूमिका काही नवीन नाही.* गेल्या ६५ वर्षांत अधूनमधून ती मांडली जात आली होती. किंबहुना देश एकसंध न राहता त्याची फाळणी झाली, त्यासही नेहरूच जबाबदार होते, अशी भूमिका घेतली जात आली आहे. *मात्र २०१४ च्या निवडणूक प्रचारापासून ही भूमिका प्रचाराद्वारे पद्धतशीररीत्या पसरवली जाऊ लागली आहे.*...