-------------------------------------------- *नेहरुवाद : आयडिया ऑफ इंडिया !* ------------------------------------------- भाग -1 अलीकडच्या काही वर्षात सर्व प्रश्नांचं मूळ नेहरुंमध्येच आहे, असं बिंबवण्यासाठी पराकाष्ठा सुरु आहे; मात्र या अपप्रचाराच्या तोफेतूनही नेहरुंचे बहुआयामी व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि समग्र जीवनदृष्टी याच बाबी अधोरेखित होत राहतात. त्यामुळेच त्यांच्या काळाहूनही आज नेहरुंचे संदर्भमूल्य अधिक जाणवते आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर विशेषतः दुस-या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अनेक वसाहती स्वतंत्र झाल्या. यातील बहुतांश राष्ट्रांमध्ये एकाधिकारशाही, लष्करशाही निर्माण झाली. लोकशाही हेलकावे खाऊ लागली. या राष्ट्रांच्या स्वातंत्र्योत्तर राजकीय प्रवासाच्या आलेखावर नजर टाकली असता भारताचे वेगळेपण ठळकरित्या लक्षात येते. या अभूतपूर्व वेगळेपणात नेहरुंचा सिंहाचा वाटा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ९ वर्षे तुरुंगात असलेला माणूस स्वतंत्र भारताचा १७ वर्षे पंतप्रधान होता. त्यामुळे नेहरु हा स्वातंत्र्यपूर्व भारताला स्वातंत्र्योत्तर भारताशी जोडणारा पूल होता. या भक्कम पुलाम...