आर्थिक निकषाचे पिल्लू: गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलनाने जोर पकडला असून सरकारी अनास्थेमुळे इतके दिवस शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन अचानक हिंसक झाले आहे. आरक्षणासाठी "करा किंवा मरा" या दृढ निश्चयाने मराठा युवक, युवती आणि समाजातील लोक आपापल्या भागात विविध मार्गाने आंदोलन आणि निषेध व्यक्त करत आहेत. आंदोलनाच्या वेळी विविध भागातील सर्व जातीय लोकांनी मराठा आंदोलनाला उस्फुर्त पाठींबा दिला आणि सर्व भागातील संप यशस्वी झाले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा झाला. वेळेवर सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने महाराष्ट्र सरकारबरोबर केंद्र सरकारलाही या आंदोलनाची धग जाणवू लागली आहे. आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असतानाच एका बाजूला आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे असे म्हणणाऱ्या राजकीय पक्षांच्या समविचारी संघटना आणि राजकीय नेते आरक्षणाच्या राज्यघटनेतील तत्वाला हरताळ फासण्याचे प्रयत्न करत आहेत. आरक्षणाची तत्वे आणि मूळ मुद्दा बाजूला टाकण्यासाठी मराठाच काय कोणत्याही आरक्षणाला विरोध असलेले पण आरक्षणाच्या विरोधाची जाहीर भूमिका घेणे अशक्यप्...